“सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली”; कृषी कायदे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. गेल्या वर्षभरापासून ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, ते कायदे मागे घेतल्याचा निर्णय आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं असून भाजपा नेते मात्र या निर्णयावर नाराज आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले, “शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो”.