जवान आणि मुंबई पोलिसांमध्ये तुंबळ युद्ध व्हावं अशी आयुक्तांची अपेक्षा
मुंबई | भाजप नेते आणि विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकारकडून पोलिसांना हाताशी धरून कशा प्रकारे राज्यात दहशत निर्माण केली जात आहे, याबाबतची माहिती राज्यपालांनी दिली, अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसंच किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने केलेला अन्याय राज्यपाल कोश्यारी यांच्यासमोर मांडला, असंही दरेकर यांनी सांगितलं आहे.
राज्यपालांची भेट घेऊन राजभवनातून बाहेर येताच प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर अनेक घणाघाती आरोप केले. पोलिसांच्या उपस्थितीत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झालेला असताना पोलीस आयुक्त विचारतात की सीआएसएफचे जवान काय करत होते. सीआयएसएफ जवानांनी तेव्हा गोळीबार करावा आणि महाराष्ट्र पोलीस व सीआयएसएफ जवानांमध्ये तुंबळ युद्ध व्हावं, अशी पोलीस आयुक्तांची अपेक्षा होती का? असा संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
‘किरीट सोमय्या यांच्या हत्येचा डाव’
‘आम्ही गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलो असतो, मात्र सरकार न्याय देईल असं आता आम्हाला वाटत नाही, हे सरकार सुडाने पेटलेलं आहे. किरीट सोमय्या हे पुराव्यानिशी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनाच नष्ट करा, असा डाव सरकारकडून आखण्यात आला होता, असा दावाही दरेकर यांनी केला आहे. राज्यपालांनी गृहसचिवांकडून या घटनेचा अहवाल मागवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या हकालपट्टींची सोमय्यांकडून मागणी
किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांसह राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शिवसेनेच्या गुंडांना वाचवण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खोटा एफआयआर दाखल करून त्याआधारे कारवाई केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ताबोडतोब पोलीस आयुक्त संजय पांडे यांची हकालपट्टी करावी,’ अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.