लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा
CAA News : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA कायदा लागू होण्याची दाट शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशभरात अनेक राजकीय कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत असून, अनेक धोरणांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत.मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात केंद्र सरकार देशात नागरिकता संशोधन कायदा अर्थात सीएए लागू करण्याच्या तयारीत दिसत आहे. निवकणुकीआधी आचारसंहिता लागू होणार असून, त्याआधीच हा कायदा केंद्राच्या वतीनं लागू करण्यात येणार आहे.
CAA लागू करण्यासाठी पोर्टलही तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक नागरिकांना CAAचा सर्वाधिक फायदा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच CAA लागू करण्यासंबंदी घोषणा करतील असं म्हटलं जात आहे.
सीएएअंतर्गत मोदी सरकार, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गैर मुस्लीम विस्थापित हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन नागरिकांना भारतीय नागरिकत्वं प्रदान केली जाणार आहे. ३१ डिेसेंबर २०१४ पूर्वी/पर्यंत भारतात आलेल्यांसाठी हा कायदा लागू असेल.
हेही वाचा – ठाकरेंचा शिंदेंना पहिला मोठा धक्का
जवळपास चार वर्षांहून अधिक काळानंतर सीएएचा हा कायदा लागू करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यासाठी रितसर पोर्टल तयार असून, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. इथं अर्जदारांना ते कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात नेमके केव्हा आले हे वर्ष सांगावं लागणार आहे. इथं अर्जदारांकडून कोणताही कागदोपत्री पुरावा मागण्यात येणार नाही.
२०१९ मध्ये ज्यावेळी सीएए संसदेत पारित करण्यात आला आणि त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली तेव्हा देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याविरोधात आंदोलनं झाली, यामध्ये अनेकांचा बळीही गेला. ४ डिसेंबर २०१९ ला आसाममध्ये सीएए विरोधात मोठं आंदोलन झालं आणि पाहता पाहता संपूर्ण देशातून ही विरोधाची लाट उसळली. तेव्हा आता येणारा प्रत्येक दिवस या कायद्यासंदर्भातील मोठी घडामोड घेऊन येणार असं म्हणणं गैर नाही.