अहमदनगरमध्ये १० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक
अहमदनगर |
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर १० वी १२ वीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग (Fire) लागली. संगमनेरमधील चंदनापुरी घाटात ही घटना घडली. टेम्पोच्या मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने दाखल होत टेम्पोला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला होता.
या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली, तरी टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला. या टेम्पोमधील दहावी बारावीच्या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांनी दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या १२ वीच्या लेखी पेरीक्षा नियोजित वेळेत सुरू होणार की नाही असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, पुणे राज्यमंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी या परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी, असं आवाहन केलं.