सोन्यासारखे शहर भकास करणाऱ्या भाजपला धडा शिकवा: अनिल पाटील
पिंपरी : “राष्ट्रवादीच्या काळात पालिकेकडून महिला बचत गटांना मिळणारी मदत भाजपच्या सत्ताकाळात पूर्ण थांबवण्यात आली… एक दिवसाआड पाणी येतंय… तेही रात्री दोन -अडीच वाजता… शास्तीकर, अनधिकृत बांधकामांची धास्ती आहेच… पाच वर्षांत विकासाच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार… वाढलेली महागाई… खरं सांगतेय भाजपवाल्यांनी आमचं जगणंच मुश्किल करून टाकलंय…. ! ” महिलांच्या भावनांचा बांध फुटलेला अन् भाजपविरोधी आक्रोश पहावयास मिळाला. वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमधील नागरिक, महिलांनी भाजपची सत्ता हटवून पुन्हा सुशासन आणण्यासाठी मोहिम हाती घेत चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना एकमुखी पाठींबा दर्शविला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ बिजलीनगर, वाल्हेकरवाडी परिसरामधील नागरिकांच्या भेटीगाठी तसेच सोसायट्यांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंमळनेरचे आमदार अनिल पाटील, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगलाताई कदम, वैशालीताई काळभोर, धनंजय भालेकर, राजेंद्र साळुंखे, माऊली सुर्यवंशी, आशाताई सुर्यवंशी, वैशाली कदम, सुनील पाटील, जितेंद्र पाटील, योगेश पाटील, रविंद्र महाजन, मोतीलाल पाटील, भवसार पाटील, शाम देसाई, संदीप जगताप, सौरभ काटे, स्वप्नील काटे, शुभम काटे, शुभम वाल्हेकर, संदीप चिंचवडे, यश चिंचवडे, धनाजी वाल्हेकर यांच्या उपस्थितीत सोसायटीतील मतदारांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी देशात, राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून वाढलेल्या अडचणींची जंत्रीच उपस्थितांनी वाचून दाखवली.
अडचणी मांडताना नागरिकांनी भाजपच्या सत्ताकाळातील बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. यानंतर बोलताना आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त करतानाच महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करा, सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही बांधील राहू, असे आश्वासन दिले.
आमदार अनिल पाटील यावेळी म्हणाले, विधीमंडळात शास्तीकराचे प्रश्न असो अथवा अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असो… विधीमंडळात मांडून सोडवावे लागतात. त्यासाठी नाना काटेंच्या माध्यमातून ते प्रश्न विधीमंडळात मांडून सोडवले जातील. या भागाचे प्रश्न सोडवायचे असतील, हा भाग विकसित करायचा असेल तर विकासाचे व्हिजन असणारा आमदार व्हायला हवा. विकासाचे व्हिजन नाना काटे यांच्याकडे आहे. पिंपळे सौदागरचा विकास त्यांनी ज्याप्रमाणे केला त्याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघ विकसित करायचा असेल तर नाना काटे यांना विजयी करा, असे आवाहन केले.
या शहराला अजित पवारांच्या व्हिजनमुळे सोन्याचे दिवस आले होते. रोजगार निर्मिती करून हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बनवण्याचा ध्यास अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, सत्तांतरानंतर या शहराला भकास आणि उदास करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे. ती चूक आता सुधारावी लागेल. दादांसारखेच विकासाचे व्हिजन असणाऱ्या नाना काटे यांना विजयी करा, असे आवाहन मंगला कदम यांनी केले.