‘RCBने विराटला कर्णधार करू नये, कारण..’; माजी खेळाडूचं विधान

Virat Kohli RCB | आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ कोटी रूपये खर्चून कायम ठेवले आहे. एवढच नाही तर विराट पुन्हा एकदा आरसीबी संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, यावरून माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, विराटला पुन्हा कर्णधार बनवू नये असे त्यांचे म्हणणे आहे.
संजय मांजरेकर म्हणाले, की एकदा विराट कोहलीची प्रतिष्ठा तुमच्या मनातून काढून टाका आणि फक्त त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याच्या विक्रमांची तुलना करा. मग तुम्हाला समजेल की विराटने कर्णधार व्हावे की नाही. गेल्या वर्षी त्याने १५० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि पूर्वी त्याचा स्ट्राइक रेट १३० पेक्षा कमी होता.
हेही वाचा – ‘लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं’; अजित पवारांचं विधान
टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहली आता पूर्वीसारखा खेळाडू राहिलेला नाही. विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये आपली छाप सोडू शकतो का? ९५ टक्के चाहत्यांना विराटला कर्णधार म्हणून पाहायचे आहे. तुम्ही कर्णधार असताना त्याची आकडेवारी पाहा, त्याची खास कामगिरी फारशी खास राहिलेली नाही. ही माझी समस्या आहे. कारण मला भावनिक व्हायला आवडत नाही. चाहत्यांप्रमाणे नायकाची पूजा करून मला सत्यापासून दूर जायचे नाही. विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये नाही, पण भारताला त्याची गरज आहे. तसेच तो टी-२० क्रिकेटमध्ये तो ७-८ वर्षांपूर्वी जितका महान खेळाडू होता, तितका आता राहिलेला नाही, असे मला वाटते, असे मत संजय मांजरेकरांचे आहे.





