राष्ट्रीय : मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवारी (२३ जुलै) सुरुवात झाली. पण सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जखमी झाला असल्याने तो आता पुढील सामन्यातही खेळणार की नाही, यावर शंका उपस्थित होत आहेत. याबाबतच आता एक अपडेट समोर आली आहे. या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी सलामीला यशस्वी जैस्वाल (५८) आणि केएल राहुल (४६) यांनी ९४ धावांनी भागीदारी केली. पण या भागीदारीनंतर ते दोघेही बाद झाले. शुभमन गिलही १२ धावांवरच बाद झाला.
त्यामुळे रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने साई सुदर्शनसोबत अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र ६८ व्या षटकात ख्रिस वोक्सने टाकलेला चेंडू जोरात त्याच्या उजव्या पायवर आदळला. त्याला इतक्या असह्य वेदना झाल्या की त्याला रिटायर्ड हर्ट होत त्यावेळी मैदानातून बाहेर जावे लागले. त्यानंतर त्याला लगेचच स्कॅनसाठी हॉस्पिटलला नेण्यात आले. आता स्कॅनचे रिपोर्ट समोर आले असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तो या सामन्यात यष्टीरक्षण करताना दिसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. ध्रुव जुरेल त्याच्या जागेवर बदली यष्टीरक्षक म्हणून यष्टीरक्षण करेल. मात्र जुरेलला नियमानुसार पंतच्या जागेवर फलंदाजी करता येणार नाही.
हेही वाचा – कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे मोठ विधान; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार
अशात आता अशी माहिती समोर आली आहे की त्याला मेडिकल टीमने त्याला फ्रॅक्चर झालेल्या तळपायावर फार भार न देण्यास सांगितले आहे. पण असे असचानाच गुरुवारी म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंत प्रोटेक्टिव्ह बुट घालून स्टेडियममध्ये दिसून आला आहे. त्यामुळे तो जिद्द दाखवून किमान भारताकडून फलंदाजीसाठी तरी मैदानात येणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण यापूर्वीही अनेक खेळाडू दुखापत असतानाही संघाची गरज म्हणून अनेकदा मैदानात उतरले आहेत. त्याप्रमाणे रिषभ पंतही करणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार किमान ६ आठवड्यांसाठी रिषभला मेडिकल टीमकडून विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजेच रिषभ पंत पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही.
मात्र, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. कारण यापूर्वीच नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे चौथ्या आणि पाचव्या कसोटीतून बाहेर झाला आहे, तर आकाश दीप आणि अर्शदीप सिंग हे देखील दुखापतीमुळे चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हते. अशातच आता चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रिषभच्या दुखापतीने अधिक चिंता वाढवली आहे.
दरम्यान काही मिडिया रिपोर्ट्सनुसार रिषभच्या दुखापतीबाबत माहिती मिळताच भारताच्या निवड समितीने हालचाली सुरू केल्या असून पाचव्या कसोटीसाठी ईशान किशनला संघात सामील करण्याचा विचार केला आहे. आता या सर्व गोष्टींबाबत बीसीसीआय काय भाष्य करणार यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील.





