भारत अ महिला संघाची रायझिंग स्टार्स आशिया चषकाच्या सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री

Rising Stars Asia Cup | रायझिंग स्टार्स महिला आशिया चषक २०२६ मध्ये भारत अ महिला संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने नेपाळ अ संघावर ७ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली. राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने हा विजय तब्बल १२ षटकं (७२ चेंडू) राखून मिळवला.
गोलंदाजांची भेदक कामगिरी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या नेपाळ अ संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आव्हान दिलं. नेपाळचा संपूर्ण संघ अवघ्या ७८ धावांत गारद झाला. सलामीवीर बिंदू रावल (११) आणि समझाना खडका (२२) यांनी काहीशी झुंज दिली. कर्णधार पूजा महातो (१०), रूबी पोतदार (१२) आणि कबिता जोशी (१२) यांनी दुहेरी आकडा गाठला; मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले.
भारताकडून तनुजा कंवरने भेदक मारा करत ४ षटकांत १२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. मिन्नू मणीने ३ तर कर्णधार राधा यादवने २ विकेट्स घेतल्या. तनुजा कंवरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हेही वाचा : ‘मुलुंडमधील अपघात नाही, तर प्रशासनाने केलेला खून’; अमित ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
वृंदा दिनेशची मॅचविनिंग खेळी
७८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली. दिया यादव २ धावांवर बाद झाली. अनुष्का शर्मा १० धावा करत माघारी परतली. मात्र एका बाजूने वृंदा दिनेशने संयमी आणि आक्रमक खेळ करत डाव सावरला. त्यानंतर तेजल हसबनीससोबत तिने चांगली भागीदारी रचली. तेजलने १२ चेंडूत ३ चौकारांसह १८ धावा केल्या. शेवटी वृंदा दिनेशने १८ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ३९ धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
भारत अ संघाने अवघ्या ७.५ षटकांत ३ विकेट्स गमावत ८२ धावा करत सामना जिंकला आणि सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. भारत अ संघाच्या या दमदार कामगिरीमुळे स्पर्धेतील विजेतेपदाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.




