शासन आपल्या दारी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव मावळातील भेगडे लॉन्स येथे आयोजन, आमदार सुनील शेळके यांची संकल्पना
वडगांव मावळ : शासन स्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असतात.सदर योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांसाठी जनजागृती केली जाते.मात्र नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची सविस्तर माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शासनाच्या योजना, तसेच विविध उपक्रमांची माहिती एकाच छताखाली सहजरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, जेष्ठ नागरिक यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत भेगडे लॉन्स येथे शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास पहिल्याच दिवशी मावळवासियांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. लहान-थोर, अबाल वृद्ध, महिला-पुरुषांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आवश्यक दाखले काढून घेतले. यावेळी या ठिकाणी आमदार सुनील शेळके प्रत्यक्ष उभे राहून कुणाची काहीही गैरसोय तर होत नाही ना, याकडे स्वतः जातीने लक्ष घालत असल्याचे पहायला मिळाले.
यासाठी नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करुन देणारी शासनाची कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अनेक कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयांमध्ये जावे लागते.काही वेळा अनेक लोकांना शासनाच्या योजनांची माहिती नसते आणि माहिती असुनही योजनांचा लाभ गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा खरा उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे या अभियानातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जात आहे.
एकाच छताखाली सर्व समस्यांचे निराकरण
या अभियानात महसूल, कृषी, महावितरण,पाटबंधारे, वन विभाग पंचायत समिती, भूमी अभिलेख तसेच महा-ई-सेवा केंद्र तसेच विविध दस्तावेज उपलब्ध करुन देणारे या विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी सहभागी झाले असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी होत आहे.
शासन आपल्या दारी या अभियानाद्वारे नागरिकांना असलेल्या सवलती नागरीकांना समजल्या पाहिजेत. प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक नागरीकाला मिळालयला हवा यासाठी हे अभियान राबवले जात आहे. केवळ शहरातीलच नागरीकांन नाही तर ग्रामिण भागातील नागरीकांनादेखील याचा लाभ मिळायला हवा. हाच या अभियानाचा उद्देश आहे.
मावळ तालुक्यातील गाव निहाय आपण शासन आपल्या दारी हे अभियान एकाच छताखाली राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व नागरीकांना सर्व समाज घटनकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, ज्या काही सवलती आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या करिता हे अभियान सुरू करण्यात आले आहे. कुसगावपासून पवन मावळातील तुंग तिकोण्यापर्यंत आंदर मावळातील तुमरस लोणीपासून ते खांडी सावळापर्यंत संपूर्ण गाव, वाडी, पाडा नागरीकांकरिता या योजनेचा लाभ होणार आहे. संपूर्ण ग्रामिण भागातील नागरिकांकरिता भेगडे लॉन्स या ठिकाणी सर्व विभाग पंचायत समितीतील जेवढे विभाग, मतदार नोंदणी विभाग, पाट बंधारे विभाग, महसूल विभाग, वन विभाग, अन्नधान्य पुरवठा विभाग, महावितरण विभाग, उज्वला गॅस योजना, रमाई आवास योजना या सर्व योजनांच्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत. रोज ग्रामपंचायती हद्दीमध्ये येणाऱ्या नागरिकांनाच या ठिकाणी बोलावण्यात आले आहे. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरीकाचे काम झालेच पाहिजे, अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या गोष्टीचे समाधान वाटतेय की, नागरीकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून या ठिकाणी आले आहेत. त्यांचे 90 टक्के काम हे पूर्ण करून देण्यावर आमचा भर असेल.
-आमदार सुनील शेळके
आमदार महोदय ऑन दी स्पॉट अन अधिकाऱ्यांकडून कामाचा निपटारा…
मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायती असून, पहिल्याच दिवशी 14 ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरीकांची विविध शासकीय कामे युद्धपातळीवर मार्गी लावण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील येण्या-जाण्याची तसेच नाष्ठ्यासह जेवणाचीदेखील सोय आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे आमदार सुनील शेळके स्वतः वडगांवमधील भेगडे लॉन्स येथे प्रवेशद्वाराजवळ टेबल लावून बसलेले आहेत. ते स्वतः लक्ष घालून कुणाला काही अडचण तर येत नाही ना याची पाहणी तसेच विचारपूस करत आहेत.