खासदार डॉ. कोल्हे तुम्ही शब्द फिरवला : पहिल्या बारीची घोडी तुम्हाला धरता आली नाही!
गोडसे प्रकरणानंतर शिरूरचे खासदार पुन्हा टीकेचे धनी
बैलगाडा शर्यत प्रेमींनी सोशल मीडिया वरून केले ट्रोल
माजी खासदार आढळराव पाटलांनीही नाव न घेताला घेतला खरपूस समाचार
पिंपरी । प्रतिनिधी
‘‘ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी समोर घोडी धरणार म्हणजे धरणार…’’ चांगल्या वक्तृत्वाचे धनी असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींना हे आश्वासन दिले खरे, मात्र हा शब्द त्यांना पाळता आला नाही. त्यामुळे मोठ्या तोऱ्यात बोललेल्या आपल्याच वक्तव्यावर डॉ. कोल्हे यांना ठाम राहता न आल्याने “खासदार साहेब, तुम्ही शब्द फिरवला” असे म्हणण्याची वेळ येथील बैलगाडा शर्यत प्रेमींवर आली आहेच. शिवाय अनेक युवकांनी देखील खासदारांना ‘सोशल मीडिया’वर ट्रोल केले आहे.
मावळ मतदार संघातील आमदार सुनील शेळके यांनी तसेच शिरूर मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर मतदार संघातील लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. दरम्यान या शर्यतींना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देखील खासदार कोल्हे यांना देण्यात आले होते.मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.
दरम्यान बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून श्रेयाची चढाओढ सुरू असताना खासदार कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत प्रेमींना खुल्या व्यासपीठावरून सांगितले होते की बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर पहिली शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी समोर घोडी धरणार म्हणजे धरणार” या वाक्यावर अनेक बैलगाडा शर्यत प्रेमींनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद देखील दिली होती. मात्र खासदार कोल्हे आपल्याच शब्दाला विसरले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मतदारसंघातील एवढ्या मोठ्या बैलगाडा शर्यती दरम्यान खासदार कोल्हे अनुपस्थित राहिले. यावरून आयोजक असलेल्या आढळराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कोल्हे यांचे नाव न घेता त्यांचा उपरोधिक पाने चांगलाच समाचार घेतला.
दरम्यान, खासदार कोल्हे आपला शब्द फिरवल्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. युवकांमध्ये त्यांच्याविषयी असलेली क्रेझ यामुळे कमी होत आहे की काय असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका यामुळे त्यांची इमेज डॅमेज झालेली दिसून येत असताना आता पुन्हा बैलगाडा शर्यत प्रेमींना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे कोल्हे पुन्हा एकदा ‘बॅकफूट’वर गेल्याचे दिसून येते.
काय म्हणाले आढळराव-पाटील?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला. बैलगाडा शर्यतींसाठी खासदार कोल्हे यांना जाहीर आमंत्रण दिले होते. तुम्ही बैलगाडा शर्यतीसाठी या. तुम्ही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी का होईना, लांडेवाडीत आमच्या घाटात या आणि घोडीवर बसा, असे आमंत्रण त्यांना होते. मात्र, ते आले नाहीत आणि येणार नव्हतेच, असे आढळराव म्हणाले. तूर्त आढळरावांच्या टीकेवर खासदार कोल्हे यांनी कोणतेही प्रत्युत्त्र दिलेले नाही.