“..त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही”; शुभांगी पाटील स्पष्टच बोलल्या
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार घोषीत केलं. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप होत आहे. यावर शुभांगी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माविआतील काँग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेसने माझ्यासाठी प्रचार केला नाही या विषयी मला तरी माहिती नाही. जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर किंवा नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोहचण्याआधी महाविकास आघाडीचे नेतेमंडळी हजर होते. मला रस्त्यावर घेण्यासाठीही तेच होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही, असा कोणताही विषय नाही, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.
मला जेवायला वेळ मिळत नव्हता, तर लोक मला खायला घेऊन येत होते. माझ्याजवळ रडत होते. शुभांगी पाटीलवर जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम जनतेने कोणावर केलं नसेल. मी भाग्यवान आहे. त्यामुळे कोणी काहीही सांगो, बलाढ्यशक्तींनी सांगितले तरी विजय माझा आहे, असंही शुभांगी पाटील म्हणाल्या.
दरम्यान, विजय फार दूर नाही. फार चांगल्या मतांनी हा विजय होईल. मतदान १ लाख २९ हजार ४५६ इतकं झालं आहे. त्यातून बाद होणाऱ्या मतांनंतर कोटा ठरवला जाईल. जे प्रमाण ठरवलं जाईल, त्यानुसार विजयी उमेदवार ठरेल. त्यानुसार विजयासाठी जो कोटा आहे, त्यापेक्षा जास्त मतदारांना मी वैयक्तिकरीत्या ओळखते. त्यामुळे विजय माझाच आहे, असं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.