नितेश राणेंना पोलीस कोठडीत पाठवल्यानंतर कोकणातून शिवसेनेची प्रतिक्रिया; म्हणाले “त्यांची कशी जिरली…”
मुंबई |
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आज भाजपाचे आमदार नितेश राणे यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची चौकशी केली जात आहे. सुप्रीन कोर्टाच्या आदेशानुसार नितेश राणे बुधवारी कणकवली कोर्टात शरण आले, त्यानंतर युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याआधी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणेंची सुपारीबाज आमदार म्हणून प्रतिमा झाल्याची टीका यावेळी त्यांनी केली.
“भाजपा नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील वारंवार हा कट असल्याचा आरोप करत होते. पण संपूर्ण घटनाक्रमात सरकारचा संबंध कुठे आला?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. “आम्ही पैशाने जग जिंकू, काहीही विकत घेऊ शकतो असा गर्व असेल तर ते शक्य नाही. कोर्टाच्या आदेशाने पोलीस कोठडी झाली आहे. भाजपा नेते सरकारची हुकूमशाही असल्याची टीका करत होते. कोर्टात असताना न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं सांगायचं आणि न्यायदेवतेने निर्णय दिल्यानंतर सरकारविरोधात आरडाओरड करणं ही दुटप्पी भूमिका बंद करावी,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
- “हा दहशतवाद भाजपा नेत्यांना मान्य आहे हे का?”
“यापूर्वी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा राणे कुटुंब भाजपाच्या लोकांना दहशतवादी वाटत होतं. पण आता भाजपाची जुनी मंडळी संतोष परब हल्ल्याचा एकाही शब्दाने निषेध करत नाहीत याचा अर्थ हा दहशतवाद त्यांना मान्य आहे हे का? हे जाहीर करावं,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
नितेश राणे यांच्या “समय बलवान है” बुधवारच्या ट्वीटचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. “नितेश राणे यांचं बरोबर आहे. समय बलवान होता म्हणून योग्य वेळी योग्य वेळेने साथ दिली, म्हणून तुम्हाला पोलीस कोठडीत जावं लागलं. यामुळे समय बलवान आहे हे त्यांचे वाक्य तंतोतंत बरोबर आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
- “धनशक्तीने न्याय मिळवता येत नाही”
“आजही बेताल वक्तव्यं केली जात असून यापुढे जनता, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असला दहशतवाद सहन करणार नाहीत. धनशक्तीने न्याय मिळवता येत नाही. या पोलीस कोठडीमुळे सर्वसामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
- “सुपारीबाज आमदार ही त्यांची प्रतिमा”
“अजून तीन आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत, त्याचाही तपास झाला पाहिजे. महाराष्ट्रात सुपारी देऊन कार्यकर्ता संपवण्याची प्रवृत्ती नव्हती. म्हणूनच सुपारीबाज आमदार ही त्यांची प्रतिमा मतदारसंघ, जिल्ह्यात निर्माण झाली आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
- “आपली कशी जिरली ते पहावं”
“केंद्रीय मंत्र्यांना माझ्या पराभवासाठी थांबावं लागलं, काही मतदारांचं अपहरण करावं लागलं. माझी जिरवली म्हणत होते, पण त्यांची कशी जिरली हे त्यांना काल समजलंसुद्धा नसेल. दुसऱ्याची जिरवण्यापूर्वी आपली कशी जिरली ते पहावं. कणकवलीत शिवीगाळ, हल्ला अशाच गोष्टी समोर येत असतात. भाजपाचे जुने लोक मात्र त्यावर एक शब्दही काढत नाही. नव्या राणे भाजपाकडून मला त्याची अपेक्षाही नाही,” असं यावेळी ते म्हणाले.
- काय आहे प्रकरण…
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.१८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.
या नोटीसीनंतर आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, राकेश परब आदिनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता. या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला. मुंबई उच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आमदार राणे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते तोपर्यंत दहा दिवस त्यांना अटकेपासून सवलत देणारे आदेश न्यायालयाने दिले होते. या रम्यान दोन दिवसापूर्वी जिल्हा न्यायालयामध्ये नियमित जमीन मिळावा म्हणून आमदार राणे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन अर्ज काल मंगळवारी फेटाळला. त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र ती मागे घेत्याचे अँड सतिश माने शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते.