‘मोदींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढे ढकलावा’; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदन यांचं आवाहन
Ram Mandir Ayodhya | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. मात्र, चार पीठांच्या चार शंकराचार्यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध दर्शवला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख पुढे ढकलावी असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद नेमकं काय म्हणाले?
आमच्यासाठीच नाही तर कोट्यवधी सनानत धर्म मानणारे हिंदू यांच्या मनात आज वेगळ्या भावना आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि आता गृहमंत्री आहेत जे म्हणजे आपले अमित शाह. भाजपाचे १५ कोटी मतदार असतील. संघाचे आणखी ५ ते १० कोटी समजा. २५ कोटी भाजपाच्या बाजूने असतील तर उरलेले ७५ कोटी लोक कोण आहेत? ते हिंदू आहेत. त्यांना वाईट वाटतं आहे कारण त्यांना हे वाटतं आहे की ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या धर्माप्रमाणे व्हाव्यात. अजूनही वेळ गेलेली नाही. पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठेची तारीख पुढे ढकलावी ही आमची इच्छा आहे. मंदिर पूर्ण झालं की मग प्राणप्रतिष्ठा करा.
आमचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन आहे की आम्ही तुमच्या विरोधात मुळीच नाही. मात्र मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊ द्या. आम्ही तुमच्या विरोधात आहोत ही बाब मनातून काढून टाका. आम्हाला पंतप्रधान असेच हवेत जे चांगले निर्णय घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये चांगले गुण आहेत. अशास्त्रीय कार्य करु नका. आज तुम्ही देशाचं नेतृ्त्व करत आहात. मनमानी करु नका. हुकूमशाह जर चांगल्या मार्गावर चालला तर तोही चांगलाच असतो. आमच्या कुठल्याही क्लिप वगैरे दाखवल्या जात आहेत. मात्र आम्ही पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाही.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहरात गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार
आम्ही कुठल्याही आमंत्रणाला नकार दिलेला नाही. कारण वस्तुस्तिथी ही आहे की आम्हाला अजून आमंत्रणच मिळालेलं नाही. त्यामुळे आमच्यावर हा आरोप होऊ शकत नाही की आम्ही राम मंदिरातल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण धुडकावलं. राम मंदिर ट्रस्टने आम्हाला निमंत्रण, आमंत्रण का दिलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे. इतर तीन पीठांना आमंत्रण मिळालं आहे की नाही हे मला ठाऊक नाही. आम्हाला आमंत्रण मिळावं अशी अपेक्षा आम्ही करत नाही. आम्हाला आमंत्रण मिळालं तरीही आम्ही त्या सोहळ्याला जाणार नाही.
मंदिर हे देवाचं रुप असतं. देवाचं शरीर म्हणजे मंदिर आणि मूर्ती म्हणजे देवाचा आत्मा. त्यातला कळस हे देवाचं शीर आहे. आता शिखर म्हणजेच देवाचे डोळे तेदेखील तयार झालेले नाहीत. पायापासून ते कळसापर्यंत देवाच्या अंगांची प्रतिष्ठापना केली जाते. चेहरा, कळस हे काहीही तयार झालेलं नाही. फक्त धड तयार आहे त्यात प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे. ही कुठलीही सामान्य चूक नाही.
गाभारा तयार आहे त्यामुळे प्राणप्रतिष्ठा होऊ शकते का? असं विचारलं असता शंकराचार्य म्हणाले, मंदिराचा गाभारा हा आईच्या गर्भाप्रमाणे असतो. गाभारा तयार झाला म्हणजे गर्भाशय तयार झालं. त्यातला देव समोर कसा येणार? त्यासाठी ९ महिने लागतात. त्यानंतर देवाचं दर्शन होतं. शरीर पूर्ण झालेलं नाही. मंदिराला शरीराचं रुपच धर्मात दिलेलं आहे ते दिलेलं नसताना प्राणप्रतिष्ठा कशी होईल? असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.