पश्चिम महाराष्ट्राला पाऊस पावला…
- 39 पैकी सुमारे 18 धरणांमध्ये 100% साठा
पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील 39पैकी सुमारे 18 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असून नाझरे धरणामध्ये सर्वांत कमी म्हणजे फक्त 13.30 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोर आणि भिमा खोरे विभागात एकूण 39 धरणे आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही दिवसांतच धरणांची पातळी वाढली. पुणे जिल्ह्यातील साखळी धरणांसह कृष्णा खोऱ्यातील कोयना, राधानगरी, पाटगाव, तुळशी या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला.
भिमा खोऱ्यातील कळमोडी, चासकमान, भामा-आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, निरा-देवधर, भाटघर, वीर, उजनी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. अजूनही काही धरणक्षेत्रांत पाऊस कमी झाल्यामुळे ही धरणे 60 ते 70 टक्केच भरली आहेत.
पुन्हा पावसाची चिन्हे…
कोकण आणि मध्य महाराष्ट्र ते अहमदाबाददरम्यान चक्रीकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. ती उत्तरेकडे सरकणार असून त्यामुळे मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशासह, कोकण, मध्य महाराष्ट्र रविवारपासून राज्यात काही भागात पाऊस सुरू होईल, असा अंदाज आहे. सध्या ओरिसा आणि परिसर, छत्तीसगडचा उत्तर भाग आणि परिसरात समुद्रसपाटीपासून 3. 6 आणि 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या परिसर व गुजरातच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.