‘अजित पवार शिखर बँकेतील २५ हजार कोटींचे दरोडखोर’; शालिनीताई पाटील यांचा आरोप
मुंबई : लोकसभेत बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारने ९ वर्षात ९ सरकार पाडली असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. प्रत्युत्तरात अमित शाह यांनी वसंतदादांचं सरकार पाडल्याचा दाखला देत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. या पार्श्वभूमीवर दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शालिनीताई पाटील म्हणाल्या की, अमित शाह यांना माझी विनंती आहे की, तुम्ही माझ्या संस्थेची सुमारे २५ हजार सभासदांची मालमत्ता दिवसा ढवळ्या दरोडे घालून ज्या व्यक्तीने लुटून नेली. तो शिखर बँकेतील २५ हजार कोटींचा दरोडेखोर ज्याला सुप्रीम कोर्टाने आरोपी ठरवलं आणि त्याच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आम्ही FIR दाखल केला, याला आता ४ वर्षे पूर्ण झाली.
हेही वाचा – शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा, कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार नाही
मात्र त्याचावर आता कोणतीही कारवाई न करता त्या आरोपीला पक्षात घेता इतकंच नाहीतर त्याला राज्याचा उपमुख्यमंत्री करता हा महाराष्ट्राच्या खुर्चीसह अपमान असून जनतेचीही निराशा केल्यासारखं आहे. त्यासोबतच, तुम्ही आरोपीला पक्षात येण्यासाठी निमंत्रण देत त्याला उपमुख्यमंत्री करत तुम्ही आमच्या दु:खावर फुंकर घालत आहात की मीठ चोळत आहात? हे काही कळत नाही. यावर खुलासा करावा. मला तुम्हाला दिल्लीत येऊन भेटता येणार नाही त्यामुळे तुम्ही मला यावर उत्तर द्यावं, असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.
अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजप-शिंदे गटामध्ये गेले होते तेव्हा शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडल्याची आठवण सर्वांना झाली. त्यावेळी, शरद पवार मुत्सद्दी राजकारणी आहेत. धूर्त आहेत. ते कुणाला माफ करत नाहीत. २०२४ पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्या आधीच ते हिशोब चुकता करतील, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या.