कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया…
मुंबई |
हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्यात झालेल्या गर्दीमुळे उत्तराखंड आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. शाहीस्नानासाठी झालेल्या गर्दीनंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्र सरकार, प्रशासन, आरोग्यव्यवस्था देशातील सर्वोत्तम आहे. आम्ही सगळे मुख्यंत्र्यांच्या नेतृत्वात ही लढाई लढत आहोत. रुग्णसंख्या वाढत असली तरी संपूर्ण देशाचा विचार करा. हरिद्वारमध्ये काय झालं..लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. राज्यात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमत्र्यांनी नियंत्रण आणलं. लोकांना आवडत नसलं तरी पण सरकारने केलं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
लॉकडाउन संपूर्ण देशात लावला तरी आश्चर्य नाही
“मला जे काही चित्र दिसत आहे त्यानुसार महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर असा निर्णय लावला गेला तरी आश्चर्य वाटणार नाही. काल हरिद्धावरला सुद्धा लाखो लोक एकत्र आले, पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांच्या सभा होत आहेत त्यामानाने महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आहे. कायदा आणि नियमांचं पालन होत आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.