संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,..
अशा प्रकारे हल्ले होणं चांगल्या कायदा सुव्यवस्थेचं लक्षण नाही
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी हल्ला करण्यात आला आहे. मॉर्निग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटत आहेत. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत म्हणाले की, संदीप देशपांडे कोण आहेत? कुठे असतात ते? म्हणजे हा हल्ला नेमका कुठे झाला? कोणत्याही नागरिकावर अशा प्रकारे हल्ले होणं चांगल्या कायदा सुव्यवस्थेचं लक्षण नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे चाललंय असं म्हणटल्यामुळे असा हल्लेखोरांना बळ मिळतं, असं संजय राऊत म्हणाले.
हल्ल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे.
दरम्यान, मनसे नेते अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा अशी मागणी केली आहे. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की महाराष्ट्रातले चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांची चौकशी करावी. संदीप देशपांडे सातत्याने या लोकांच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची चौकशी करावी आणि त्यात तथ्य आढळलं तर त्यांना अटक करावी, असं म्हटलं आहे.