वंचित बहुजन आघाडीसह सुती तुटली? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मुंबई | लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, तरीही अद्याप राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभाग होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, आज धुळवड आहे आणि लोकशाहीचाच रंग उधळला जाईल. अहंकार, मस्तवालपणातून काही प्रयत्न सुरु आहेत. पण लोक लोकशाहीचा रंग उधळतील आम्हाला खात्री आहे. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना जशी अटक करण्यात आली आहे तो प्रकार लोक सहन करणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. केजरीवाल यांना अटक होताच लोक दिल्लीसह देशात रस्त्यावर उतरले आहेत. हुकूमशाही लादली गेली तर लोक रस्त्यावर उतरतात. हुकूमशहांना लोक हाकलून देतात.
हेही वाचा – भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची कार दिल्लीतून चोरीला
जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्लांनी महाराष्ट्र सदनाला का विरोध केला आहे ते बघावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करणार आहोत. त्यावेळी उद्धव ठाकरेही दिल्लीत जाण्याचा विचार करत आहेत. अरविंद केजरीवाल यांना मोदी घाबरतात. त्यामुळे त्यांना तुरुंगात मोदींनी डांबण्यात आलं आहे. ते तुरुंगातून काम करत आहेत त्यामुळे लोक त्यांचं नक्की ऐकतील. तुरुंगातून बाहेर आल्यावर ते आणखी बळकट होतात. भाजपाचे लोक भांग पिऊन विरोधातल्या नेत्यांना गँगस्टर म्हणत आहेत. ते शुद्धीत नाहीत. छगन भुजबळ, नवाब मलिक तुरुंगात जाऊन आलेत ते गँगस्टर आहेत का? अजित पवारांना तुरुंगात धाडणार होतात ते गँगस्टर आहेत का? असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेची लोकसभेची पहिली यादी उद्या जाहीर होईल. १५ ते १६ जागा आम्ही जाहीर करु. प्रकाश आंबेडकर वंचितचे नेते आहेत. ते आमच्यासह रहावेत हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांना दिला आहे. त्यांना प्रस्ताव मान्य आहे की नाही हे त्यांच्यावर आहे. Prakash Ambedkar. प्रकाश आंबेडकर बरोबर असते तर मताधिक्य वाढलं असतं. मात्र आम्ही परावलंबी नाही. जनता आमच्या बरोबर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी प्रस्ताव मान्य करायला पाहिजे होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.