‘उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील’; बावनकुळेंच्या विधानावरून संजय राऊतांची शिंदे गटावर टीका
४०-४५ जागांचे तुकड्यावर त्यांना जगावं लागेल
मुंबई : २०२४ विधानसभा निवडणुका दरम्यान भाजपा २४० जागा लढवेन आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनीही यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने २०१४ मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती. ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर ४०-४५ जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही. राज्याचा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष सांगतो, तुम्हाला ४० जागा देऊ, २५ जागा देऊ उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील. हीच त्यांची लायकी आहे. त्यामुळेच भाजपाने शिवसेना तोडली. त्यांना या महाराष्ट्रात शिवसेनेचा दरार संपवायचा होता, अशी टीका संजय राऊत यांनी केला आहे.
मुळात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का? त्यांना शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्नतरी माहिती आहेत का? तर दुर्देवाने याचं उत्तर नाही असे आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ सुप्रीम कोर्टाच्या निकालाची काळजी आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल सुद्धा विकत घेता येईल का? यावर त्यांचा विचार सुरू आहे. पण आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राला न्याय मिळेल, असं संजय राऊत म्हणाले.
सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या की नाही, हा वादाचा विषय आहे. कारण शेतकऱ्यांच्या मोर्चा आजही सुरू आहे. दुर्देवाने एका शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. याला सरकारचा बेकिरीपणा, निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत. दोन फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमके होते. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायश्चित तुम्ही केलं पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.