अजित पवरांच्या भेटीवरून संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. या भेटीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, नाना पटोले मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडे आले. तिथे मी, आदित्य ठाकरेही हजर होते. परवा त्या दोघांमध्ये (अजित पवार आणि शरद पवार) जी बैठक झाली, त्यावर मातोश्रीवर चर्चा झाली. महाराष्ट्रात वारंवार संभ्रमाचं वातावरण निर्माण होतंय. त्यामुळे महाविकास आघाडीवर होणाऱ्या परिणामावर चर्चा झाली.
हेही वाचा – ‘शरद पवार यांना भाजपकडून दोन मोठ्या पदांच्या ऑफर्स’; पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट
रोहित पवार, शरद पवार यांची वक्तव्य मी पाहिली. शरद पवार म्हणाले ते माझे पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचंही नातीगोती सांभाळायची वगैरे वक्तव्य ऐकलं. पण मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचं? हा प्रश्न आहे. उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो तर काय होईल? आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचं, नातीगोती पाळायची आणि खाली कार्यकर्त्यांनी मग आपल्या विचारसरणीसाठी एकमेकांविरोधात लढायचं? मला वाटतं शिवसेनेच्या डीएनएमध्ये असं ढोंग नाही, असं संजय राऊत म्हणाले.
ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. त्यात महाभारताप्रमाणे स्वकीय, मित्र, नातीगोती यांची पर्वा आम्हाला करता येत नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. लोकांमध्ये संशय आणि संभ्रम येईल अशी भूमिका किमान भीष्म पितामहांकडून तरी अपेक्षित नाही. आमची भूमिका त्या बाबतीत स्पष्ट आहे. नातीगोती, प्रेम घरात. या राज्यासमोर आव्हान उभं करण्यात आलं आहे. चुकीच्या लोकांबरोबर हातमिळवणी करून जर कुणी आम्हाला आव्हान देत असेल, तर ते आमचे नातेवाईक नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.