‘इस्त्रायलमधून EVM हॅकिंगचं तंत्र भारतात आणलं’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : संसदेतील खासदार निलंबन प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, इस्त्रायलमधून EVM हॅकिंगचं तंत्र भारतात आणलं असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, लोकशाहीच्या पवित्र मंदिराचे स्मशान केलेले आहे. आज आम्ही स्मशानात जात आहोत. विरोधी पक्ष अजिबात निराश झाला नाही. मात्र ३ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर तुम्हाला सत्तेचा माज आणि विजयाची नशा चढली आहे. त्या नशेत तुम्ही संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघाला आहात. तुम्ही आग लावली तरी देशातील १४० कोटी जनता सती जाणार नाही. ती लढत राहील.
हेही वाचा – ‘मी भारतात चालकविरहित कार येऊ देणार नाही’; नितीन गडकरींचं ठाम मत
विरोधी पक्षांची काल बैठक झाली. त्यावर निलंबनाबाबत चर्चा झाली. त्यात मला कुठेही निराशेचा सूर दिसला नाही. भविष्यात २०२४ मध्ये तुमच्यावर निराश आणि वैफल्यग्रस्त होण्याची वेळ येईल हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींनी इस्त्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. मोदींनी त्या देशाच्या निवडणुकीची यंत्रणा जाणून घ्यावी. इस्त्रायलमधून आपल्या देशात ईव्हीएम हँकिंगचे तंत्र आले आहे हे सगळ्यांना माहिती आहे.परंतु इस्त्रायलमध्ये निवडणूक बॅलेट पेपरवर होतात. महाशक्तीबाबत बोलता पण लोकशाहीत महाशक्ती लपून सत्तेत येत नाही. तुम्ही उघडपणे सामोरे या आणि लढाई करा, असं आव्हान संजय राऊतांनी केलं.
महाशक्तीचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. EVM सोबत जी VVPAT येते त्याचे १०० टक्के मोजणी व्हायला हवी. आम्ही देशातील हुकुमशाहीविरोधात लढत राहू. आम्ही मिंदे नाही, गुडघे टेकायला. लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी ही आमच्याही खांद्यावर आहे. लोकशाहीचे मंदिर मोडून काढायचे आणि राम मंदिराचे उद्घाटन करायचे. लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान करायचे आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराचे उद्घाटन करायचे हे ढोंग आमच्याकडे नाही.राम मंदिर आणि लोकशाही मंदिर संसद यांची प्रतिष्ठा राहायला हवी. लोकशाहीचं मंदिर उद्ध्वस्त करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर राम तुम्हाला पावणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.