लोकसभा निवडणूक लढवणार का? संजय राऊत म्हणाले..
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संजय राऊत हे ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावरून स्वत: खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो. आदेश आल्यावर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश जो असेल ते मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. ईशान्य मुंबईत राऊत सोडून द्या साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी सव्वा दोन लाख मतांनी विजयी होईल.
हेही वाचा – ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान
ईशान्य मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या मदतीने सातत्याने भाजपचा उमेदवार ईशान्य मुंबईत निवडून आला आहे. त्यामुळे इथे आमच्यातील साधा कार्यकर्ता, पदाधिकारी आणि कोणीही उभा केला तरी ईशान्य मुंबईत शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, साहेबांच्या नावावर तुम्ही निवडून आला ना? हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी बोलणार नाही. शरद पवार प्रमुख नेते आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांना जे पदं मिळाली ते शरद पवार या नावामुळेच. त्यांच्या प्रतिष्ठेमुळेच. नाही तर आर आर पाटलांसारखा साधा कार्यकर्ता या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला नसता. छगन भुजबळ तुरुंगातून आल्या आल्या मंत्री झाले नसते. हे सर्व शरद पवारच करू शकतात, असंही संजय राऊत म्हणाले.