रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास सुरुवात
बंधा-यातील साठवण क्षमतेत होणार वाढ, पाटबंधारे विभागाकडून 25 दिवस काढणार गाळ
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास आज (बुधवारी) सुरुवात करण्यात आली. दापोडी पाटबंधारे विभागाच्या पोकलेन मशीनव्दारे पुढील 25 दिवस गाळ काढण्यात येईल, त्यानंतर बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून 3 लाख 68 हजार 266 रुपये खर्च येणार आहे.
पवना धरणातून रावेत येथील बंधा-यात आलेल्या पाण्यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 30 एमएलडी जलउपसा करते. रावेत बंधा-याच्या पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी झाली आहे. या बंधा-यातून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी उपसा केला जातो. या बंधा-यात एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. महापालिकेतर्फे बंधा-यातील साठलेला गाळ काढण्याचे प्रयत्न केले. परंतु, पाण्यातील गाळ काढण्यात मर्यादा येतात. नदीचे पात्र रुंद असल्याने काठावरील व नदीपात्रातील काही अंतरापर्यंत गाळ काढणे शक्य होते. तसेच नदीतील मध्यभागातील गाळ काढता येत नाही.
अशुद्ध जलउपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहामध्ये काही ठिकाणी उंचवटे आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यास जलउपसा करण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, पाण्याचा विसर्ग ‘डिसचार्ज’ होतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे आजपासून धरणातून गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. दापोडीतील पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी भवनातील 20 मीटर बुम असलेल्या पोकलेनच्या सहाय्याने गाळ काढण्यात येत आहे. 150 तास गाळ काढण्यात येणार आहे. यामुळे बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचबरोबर अशुद्ध जलउपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे.