“आम्हाला भाजपचे लोक फाईल पुरवत आहेत”; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे-फडणवीस सरकारचा हेतू भ्रष्टाचार करणं आहे आणि आम्ही हे चालू देणार नाही
भाजपचे नेते आणि शिंदे गटाचे नेते दोघे मिळून सरकार चालवत आहेत. पण फक्त शिंदे गटातीलच नेत्यांनी प्रकरणं निघत आहेत. यावरून फायली कोण देतंय हे समजून येत आहे. आम्हाला भाजपचे लोक फाईल पुरवत आहेत, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमावादाचा ठराव येताना इतर कोणतेही विषय घेऊ नका असं सांगितलं होतं. म्हणुन आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं विधानसभेत मांडली नाहीत. अनेक प्रकरणं आमच्याकडे आहेत. ही प्रकरणे देणारे भाजपचे लोक आहेत, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा एनआयटी घोटाळा हे एक टोक आहे. अजून असंख्य प्रकरणं बाहेर येतील, असही राऊत म्हणाले. राऊताच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा इतर राज्यातील सरकार असो भ्रष्टाचारी लोकांचे सरकार राजीनामे घेते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचार नको. मोदींनी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असं नागपूर मध्ये म्हटलं होतं. पण त्यांच्या आजूबाजूला पाहिलं तर भ्रष्टाचारी लोक दिसत आहेत. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा हेतू भ्रष्टाचार करणं आहे. आम्ही हे चालू देणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात मी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन पळणं फडणवीस आणि भाजपला जड होत असेल. हे सर्व अलिबाबा चाळीस चोरमधले आहेत. हळू हळू चाळीस आमदारांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील, असंही राऊत म्हणाले.