‘गुणरत्न सदावर्ते यांना संपवलं पाहिजे होतं’; शिंदे गटातील नेत्याचं खळबळजनक विधान
मुंबई : मराठा मोर्चांच्या कार्यकर्त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणावरून शिंदे गटातील नेते आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. गुणरत्न सदावर्तेंना संपवाला पाहिजे होतं, असं खळबळजनक विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे.
संजय गायकवाड म्हणाले, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळे मराठा आरक्षण हिसकावलं गेले. त्यांनी आरक्षणाविरोधाची बाजू इतकी प्रखरपणे कोर्टात मांडली, की जणू काही ते सुडानेच पेटले होते. आंदोलकांनी त्यांची कार तोडली ही शिक्षा कमीच आहे. याला संपवायला पाहिजे होते.
हेही वाचा – बीड जिल्ह्यात दोन भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू
गुणरत्न सदावर्ते संपले असते, तर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यांनी कोणी त्यांची गाडी फोडली, ते कमी झाले. गुणरत्न सदावर्ते यांची चांगली व्यवस्था करायला पाहिजे होती, असंही संजय गायकवाड म्हणाले.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तोडफोड करणारे व्यक्ती हे मराठा क्रांती मोर्चाचे आहे, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इतकंच नाही तर मनोज जरांगे यांना अटक करा, अशी मागणी देखील सदावर्ते यांनी केली आहे. दुसरीकडे हा हल्ला कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, अशा प्रकारच्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.