भोंग्याच्या मुद्द्यावर रोहित पवार बोलले; भाजप, मनसेला अप्रत्यक्षपणे लगावला टोला
अहमदनगर| ‘कुणाला वाटत असेल करोना काळात दिसलेली माणुसकी विसरली जाईल. आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलेल किंवा काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भोंग्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीचे तुलनात्मक वर्णन केले आहे.महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासंबंधी मागणी केल्यानंतर त्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. यावर आता विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. गेल्यावर्षी याच काळात करोनाची दुसरी लाट होती. त्या काळात बाकी सर्व गोष्टी माणसे करोनाशी दोन हात करीत होते. त्यावरून आता सोशल मीडियात तुलनात्मक चर्चा सुरू झाली आहे.
हाच धागा पकडून रोहित पवार यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. पवार यांनी म्हटले आहे, ‘मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत.’
‘कुणाला वाटत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलेल किंवा काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी,’ असेही पवार यांनी म्हटले आहे.