‘ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणून भाजपचेच पदाधिकारी कोर्टात गेले’; रोहित पवार यांचा आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यात उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारकडून योग्य पावले उचलली जात नाहीत, असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
रोहित पवार म्हणाले, जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा भाजपाचे काही पदाधिकारी म्हणजेच गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेले. त्याचबरोबर जेव्हा आम्ही ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाजपाचेच पदाधिकारी ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं नाही पाहिजे, यासाठी न्यायालयात गेले.
हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका… म्हणाले…
लोकांसमोर गोड बोलायचं, मोठं-मोठी राजकीय भाषणं द्यायची. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण देऊ, धनगर आरक्षण देऊ, अशी आश्वासनं द्यायची. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. नेत्यांकडून भाषणात ‘ट्रिपल इंजिन’, चौथं इंजिनबाबत बोललं जातं. पण जेव्हा हक्क देण्याची वेळ येते, तेव्हा सर्व न्यायालयावर ढकलून मोकळं व्हायचं. अशा पद्धतीने भाजपा काम करते, असं रोहित पवार म्हणाले.
भाजपाचे कार्यकर्तेच संबंधित प्रकरणं न्यायालयात घेऊन जातात. भाजपा ज्या पद्धतीने काम करतं आहे, हे आता लोकांना कळालं आहे. भाजपाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, हे लोकांना कळून चुकलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात उतरेल आणि भाजपा सत्तेतून पायउतार होईल, असं आम्हाला वाटतं, असंही रोहित पवार म्हणाले.