परभणीत रेकॉर्डब्रेक पाऊस; २३३ मेंढ्या वाहून गेल्या
परभणी – हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी बांधव सुखावले आहेत. मात्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत केले आहे. परभणीत रविवारी सायंकाळपासून तुफान पाऊस झाला. या पावसात शेतीचे, जनावरांचे, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहरी भागात पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत, तर ग्रामीण भागातही प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यात तब्बल २३३ मेंढ्या ओढ्याच्या पुरात वाहून गेल्याचे कळते आहे.
दहा मेंढपाळांच्या या मेंढ्या आहेत. रविवारी (दि.११) रात्री सुरू झालेल्या पावसाने या मेंढ्यांना पुराबाहेर पडण्याची उसंतच दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसी बुद्रुक या गावात शिवारात दोन ओढे वाहतात. या दोन्ही ओढ्यांना पूर आला आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्याच वेळी दहा मेंढपाळांच्या तब्बल २७३ मेंढ्या या शिवारात होत्या. दोन्ही बाजूंनी पाणी असल्याने आपल्या मेंढ्या बाहेर कशा काढाव्यात असा प्रश्न मेंढपाळांना पडला आणि धो धो पाऊसही सुरूच होता. त्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही, रात्रीचा अंधार आणि तुफानी पाऊस यामुळे मेंढपाळांनी लिंबाच्या झाडावर चढून कशीबशी रात्र जागून काढली. आपल्या मेंढ्या मात्र ते वाचवू शकले नाहीत. रात्री या मेंढ्या पुराच्या पाण्यात अडकल्या. त्यांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची धडपड निरर्थक ठरली. अखेर २७३ मेंढ्यांपैकी २३३ मेंढ्या दगावल्या. दरम्यान, यासंदर्भातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शिरसी येथील तलाठी यांनी प्रशासनाला कळवला आहे.