‘शरद पवार पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील’; रवी राणा यांचा दावा
मुंबई : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. येत्या १५ ते २० दिवसांत चमत्कार दिसेल, शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
रवी राणा म्हणाले, मी अनेक ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. ज्याठिकाणी गेलो तिकडे गणपतीला एकच सांगितले की, देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली पाहिजे. हा चमत्कार १५-२० दिवसांत दिसेल. लवकरच राज्यात आणि केंद्रात शरद पवारांच्या पाठिंब्याचं मजबूत मोदी सरकार दिसेल.
हेही वाचा – Bank Holiday : ऑक्टोबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद
तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, अजित पवार विरोधी पक्षनेते होते, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राजकारणात कुठलीही गोष्ट शक्य आहे. जर १५ दिवसांत शरद पवार मोदी सरकारसोबत आले तर अजित पवार हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात, असंही रवी राणा म्हणाले.
रवी राणा यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती वेडी माणसं आहेत. त्यांच्यावर मला कशाला प्रतिक्रिया द्यायला लावता. शरद पवारांबद्दल विचारत असाल, तर ते एका विचाराबरोबर नेहमी राहिले आहेत. ते काँग्रेसमधून बाहेर पडले. मात्र ते कधीही दुसऱ्या विचाराबरोबर गेले नाहीत. शरद पवार नेहमीच सर्वधर्म समभाव या विचारांबरोबर राहिले आहेत. त्यामुळे ते भाजपाला समर्थन देतील, असं मला तरी वाटत नाही. कुणीही काहीही वायफळ बोलायचं आणि त्याच्यावर मग आम्ही प्रतिक्रिया द्यायची. याची काही गरज आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.