अमली पदार्थांबाबत कलाकारांना एनसीबीचा दिलासा
अमली पदार्थांसंबंधी आणखी सिनेतारकांना समन्स पाठवला जाणार नाही, असे नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने म्हणजे एनसीबीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात चारही अभिनेत्रींची पुरेशी चौकशी झालेली आहे, असेही ‘एनसीबी’चे म्हणणे आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचे समोर आल्याने एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याअंतर्गत एनसीबीच्या विशेष पथकाने सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्ती तसेच सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका मोठ्या कंपनीची अधिकारी जया शाह, यांच्या चौकशीत सिनेतारकांची नावे समोर आली होती. त्यावरून ‘एनसीबी’ने अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर व राकूलप्रीत सिंह यांची चौकशी केली आहे. यानंतरही या सर्वांची सातत्याने चौकशी होणार असल्याचे बोलले जात असले तरी अधिकाऱ्यांनीच अधिकृत निवेदनाद्वारे त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
‘चारही अभिनेत्रींची पुरेशी चौकशी झाली आहे. अभिनेत्रींनी दिलेली काही उत्तरे संशयास्पद होती. पण तरीहीदेखील कोणाचीही अतिरिक्त चौकशी होणार नाही.या चारही अभिनेत्रींना पुन्हा किंवा अन्य सिनेतारकांना समन्स पाठविण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही’, असे ‘एनसीबी’ने निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात ‘एनसीबी’ने आतापर्यंत १८ जणांची चौकशी केली आहे. त्यामध्ये रिया-शौविक चक्रवर्ती, सुशांतसिंहचा माजी व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडासह सुशांतचा मदतनीस दीपेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर काही दलालांचीही छापे टाकून धरपकड करण्यात आली आहे, असेही ‘एनसीबी’ने स्पष्ट केले.