‘..माझ्यावर दबाव टाकला जात होता’; रॅपर राज मुंगासेचा मोठा खुलासा!
मी कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही
मुंबई : छत्रपती संभाजीनगर मधील रॅपर राज मुंगासे यांचं रॅप गाणं प्रचंड व्हायरल झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. यानंतर राज मुंगासे याचं हे रॅप गाणं प्रचंड व्हायरल झालं. याप्रकरणी अंबरनाथमधील एका महिलेच्या तक्रारीवरून रॅपर राज मुंगासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रॅपर राज मुंगासे बेपत्ता होता. यानंतर त्याने पहिल्यांदाच माध्यामांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने अनेक खुलासे केले आहेत.
राज मुंगासे म्हणाला की, मुळात मला अटक झालीच नाही. पण संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता. त्यानंतर ते लोक माझ्या घरीही गेले होते. संबंधित रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, अशा प्रकारे त्यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकला जात होता. पण मला माहीत होतं की, मी त्या व्हिडीओमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही. तसेच मी कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही. तुम्ही जर ५० खोके घेतलेच नसतील तर तुम्ही ते स्वत: वर ओढून का घेत आहात? मी फक्त चोर असा उल्लेख करत गाणं बनवलंय. त्यामुळे तुम्ही चोर असाल, तर ते गाणं तुमच्या मानाला लागणं सहाजिक गोष्ट आहे. पण त्या गाण्यात मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. तसेच मला तो व्हिडीओ डिलीट करायचा नव्हता, म्हणून मी तेथून निघून गेलो.
जेव्हा एफआयआर दाखल झाली, तेव्हा मी त्या एफआयआरचा व्हिडीओ साहेबांना (अंबादास दानवे) शेअर केला. त्यानंतर दानवेंनी त्यांच्या वकिलाचा नंबर दिला. त्यांच्या वकिलांनी मला सहकार्य केलं. तेव्हापासून मी अंडरग्राऊंडच होतो. मी कुठे आहे? याबद्दल माझ्या कुटुंबियांना काहीच माहीत नव्हतं. माझ्या घरचे थोडे हवळे आहेत. मी कुठे आहे? हे जर त्यांना जर कळालं असतं, तर त्यांनी आजुबाजूला सांगितलं असतं. त्यानंतर शेजारी कधी, कुठे जाऊन काय बोलतील? यावर माझा विश्वास नव्हता. तसेच पोलीस मला ताब्यात घेतील यामुळे मला अटकपुर्व जामिनासाठी अर्ज करायचा होता, पण त्या कालावधीत तीन दिवस सुट्टी होती, म्हणून मला लपून राहवं लागलं, असा खुलासा राज मुंगासे यांने केला आहे.