#Covid-19: लस मात्रा मिळाल्या तर दीड-दोन महिन्यांत लसीकरण
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य
जालना |
केंद्राने आवश्यकतेएवढी लस उपलब्ध करवून दिली तर राज्यातील जनतेचे दीड ते दोन महिन्यांत संपूर्ण लसीकरण होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. १४ ऑगस्ट रोजी राज्यात एका दिवसात नऊ लाख ६४ हजारांहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या आणि हा आतापर्यंतचा एका दिवसातील विक्रम होता. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले,की महाराष्ट्र राज्याची दररोज १५ लाख लसीकरणाची क्षमता आहे. प्रत्यक्षात त्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाहीत.
लसमात्रा वाढवून देण्याची आमची केंद्राकडे मागणी आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्राने वर्तविली असून त्या अनुषंगाने राज्य सरकार पूर्वतयारी करीत आहे. ज्या दिवशी राज्यात ७०० मेट्रिक टन प्राणवायूचा वापर होईल त्या दिवशी टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चारही टोपे यांनी या वेळी केला. तत्पूर्वी करोना संदर्भात जालना जिल्ह्य़ातील संबंधित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत टोपे यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले. करोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असून करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. असे असले तरी लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. जालना येथे १०० खाटांचे करोना उपचाराचे नवीन मेडिकॅब रुग्णालय उभारण्यात आले आहे. जालना जिल्ह्य़ातील आरोग्य सुविधा चांगली असल्याने अन्य जिल्ह्य़ांतील करोनाबाधितही उपचारासाठी येथे येत आहेत.
- दोन कोटी ३६ लाख दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत
१६ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात चार कोटी ९४ लाख १८ हजार करोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी एक कोटी २८ लाख ७५ हजार ४१३ दुसऱ्या मात्रा आहेत. म्हणजेच पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी दोन कोटी ३६ लाख ६७ हजारांपेक्षा अधिक जनतेला अद्याप दुसरी मात्रा देणे बाकी आहे. १४ ऑगस्ट रोजी राज्यात नऊ लाख ६४ हजार लसीकरण झाले. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी हा आकडा दोन लाख ६ हजार १६३ एवढा कमी होता. १५ ऑगस्टपर्यंत राज्यात करोनाच्या पाच कोटी नऊ लाखांपेक्षा अधिक प्रयोगशाळा चाचण्या झाल्या. यापैकी ६२ लाख ९२ हजारांपेक्षा अधिक (१२.५४ टक्के) नमुने करोनाबाधित निघाले. ६१ लाख ९० हजार म्हणजे (९६.८३ टक्के) रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.