‘राष्ट्रवादीनंतर ‘या’ पक्षातही बंडखोरी होणार’; रामदास आठवले यांचे सूचक विधान
मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, आम्ही अजित पवारांना तोडलेलं नाही. ते स्वत: आमदार तोडून इकडे आले आहेत. शिवाय फक्त अजित पवारच नाही. काही दिवसांनी बिहारमध्येही अशाच प्रकारचं बंड होऊ शकतं. कारण नितीश कुमार यांच्या निर्णयांवर तिथली जनता आणि त्यांचे आमदार नाराज आहेत. राजद सोडून ते भाजपाबरोबर आले. नितीश कुमारांचे ४५ आमदार निवडून आले असताना भाजपाचे ७७ आमदार असूनही मोदींनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, पण काही दिवसांनी ते पुन्हा राजदसोबत गेले. त्यामुळे नितीश कुमार यांच्याविरोधातही नाराजी आहे.
हेही वाचा – ‘सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटू नये’; राज ठाकरे यांचं वक्तव्य
https://twitter.com/ANI/status/
उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येऊ शकतात. ते पाटण्याच्या बैठकीला गेले नव्हते. आजकाल ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे तेही आमच्याबरोबर येऊ शकतात. पुढे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या आमदारांमध्येही फूट पडू शकते, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.