‘..अन्यथा टोलनाके जाळून टाकू’; राज ठाकरे यांचा इशारा
टोला हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा - राज ठाकरे
मुंबई : राज्यातील टोल दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे यांचे व्हिडीओ दाखवले. तसेच त्यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले, ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली, त्याविरोधात मनसे आमदार अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी उपोषणाला बसले होते. मी कालही याबाबत बोललो होतो, पण मुद्दाम आज पुन्हा सांगतोय.
हेही वाचा – Israel-Palestine Crisis : इस्त्रायलमध्ये २७ भारतीय अडकले, राज्यसभा खासदाराचाही समावेश
मला यासंदर्भात राज्य सरकारकडून एक पत्र आलं, त्या पत्रात एक स्तंभ होता. त्यात कोणत्या वाहानांना टोल आहे आणि कोणत्या वाहानांना टोल नाही, हे नमूद करण्यात आलं होतं. साधारणतः २०१० मध्ये टोल आंदोलन सुरू झालं. टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा, याचं होतं काय? त्याच-त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
पैसे मिळत असल्याने टोलनाके बंद होणे अशक्य. टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात. तसेच सरकार थापा मारणार आपण ऐकत बसायचे. प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.