‘मोदींनी भ्रष्टाचाराचा आरोप केले, अन् अजित पवार ६ दिवसांत सत्तेत गेले’; राज ठाकरे
राज ठाकरे यांचा फटकारा: सत्तेचा अमरपट्टा घेवून कुणीही येत नसतो!
पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड मध्ये पत्रकार पुरस्कार पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पत्रकारिता, सध्याचे राजकारण यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराचा आरोप केले, अन् अजित पवार ६ दिवसांत सत्तेत गेले, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, मार्मिक ते आजपर्यंतची पत्रकारिता मी स्वतः पाहत आलोय. व्यंगचित्रकार आणि पत्रकार हे एकच आहे. मी राजकारण आणि पत्रकारिता दोन्ही पाहत आलोय. त्यामुळं आज पत्रकारांवर होणारे हल्ले हे नक्कीच निषेधार्ह आहे. पण ट्रोल वगैरे करणे, मुळात हे तुम्ही वाचताच कशाला. एकदा माझा कार्यक्रम, बोलणं संपलं की मी पुन्हा कमेंट्स पाहत नाही. मग तुम्ही कशाला पाहता, हे मोबाईल म्हणजे रिकम्यांचा धंदा. घरी आलं की बोटं आपटत बसायचं, राजकारण्यांनी तर यासाठी विशेष लोकं पाळलेली आहेत. त्यामुळं तुम्ही याकडे लक्ष देणे बंद करावे. ज्यांना ज्ञान नाही, त्यांना कशाला गांभीर्याने घ्यायचं.
तुमच्या सभांना गर्दी होते मात्र त्याचं मतांमध्ये रूपांतक का होत नाही? यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मला सांगा, 2009 ते आज वर माझ्या उमेदवारांना मतं कुठून मिळतात. काय रतन खत्रीने आकडे काढले होते का? सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो. सत्ता हातात आली की ते जायला सुरू होते. विरोधी कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हारत असतो. आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का? राज ठाकरे आहे मी, हे मी खपवून घेणार नाही. मी यावर व्यक्त होणारच.
हेही वाचा – ‘राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे’; दिपाली सय्यद यांचा खोचक टोला
ब्लू प्रिंट त्याचंच एक जिवंत उदाहरण. मी ती सादर केली त्यानंतर कोणी ती ब्लू प्रिंट पाहिली नाही. फक्त मला हिणवलं गेलं. कोणी तरी सुपारी दिली की हे पत्रकार मला येऊन विचारणार. आता मला सांगा पत्रकार हल्ला ठीक आहे, तुमच्यावर हल्ला झाला की जसं वाईट वाटतं, तसंच आम्हाला ही वाटतं. तुमचं काम आमचे डोळे उघडणे, समाजाला दिशा दाखवणे, प्रबोधन करणे हे आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
१९९६ च्या दरम्यान माझ्यावर खुनाचा एक आरोप झाला. त्या प्रकरणात विविध प्रकारच्या हेडलाइन्स येत होत्या. एका सांज दैनिकाने तर मी घरात असताना राज ठाकरे फरार असं हेडिंग दिलं होतं. या रागातून जर माझ्यातला माणूस जागा झाला मी जर एखाद्याला कानाखाली वाजवली तर त्याला हल्ला म्हणणार का? पत्रकारांचं काम प्रबोधन करणं आहे. खोट्या बातम्या करणं नाही, पाकिटं घ्यायची आणि असले उद्योग करायचे हे सगळं करणं बंद करा. वाट्टेल ते बोलाल तर मी पण राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा, असं राज ठाकरे म्हणाले.
अजित पवार सत्तेत गेले. याचा खरंतर राग यायला पाहिजे. पंतप्रधानांनी आरोप केला की ७० हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर सहा दिवसांत अजित पवार सत्तेत येतात. असं घडल्यानंतर समोर असणारे पत्रकार हसत बसतात? त्यांना या गोष्टीची चिड येत नाही. राजकीय प्रतारणा केल्यानंतर पूर्वीचे संपादक गप्प बसायचे नाहीत. संपादकीय असेल किंवा लेख लिहून तासायचे. समोरच्याला समजलं पाहिजे की या माणसाने घोडचूक केली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.