Raj Thackeray : उद्धव ठाकरेंवर शब्द नाही, भाजपवर अवाक्षर नाही, पवार लक्ष्य, भोंग्याबाबत मात्र दक्ष!
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादेत भव्य सभा पार पडली. महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्रदिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. पुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा थोडाथोडा इतिहास सांगत ज्या समाजाला आपला इतिहास माहित नसतो किंबहुना जो समाज इतिहास विसरतो, तो समाज पायाखालचा भूगोल (जमीन) गमावून बसतो, असं सांगत आंबेडकर-कुरुंदकर यांच्या वैचारिक परंपेराचा त्यांनी उल्लेख केला. सभेची पहिली दहा-पंधरा मिनिटे संपल्यावर राज ठाकरेंनी महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालायला सुरुवात केली. त्यांनी पवारांच्या आस्तिक नास्तिकतेवर प्रहार करताना सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील वक्तव्याचा दाखला दिला. पुढे बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी फक्त ब्राह्मण आहे म्हणून त्रास दिल्याचा गंभीर आरोपही केला. सभेचं इप्सित म्हणजे भोंगेवादावरही त्यांनी परखड भूमिका घेत ४ तारखेपासून हा आवाज आम्ही ऐकणार नसल्याचं ठामपणे सांगितलं. जवळपास तासाभराच्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकही शब्द काढला नाही. भाजपबद्दल तर अवाक्षर काढलं नाही. भीम आर्मीसह अनेक संघटनांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यावरही राज ठाकरे बोलले नाही.
राज ठाकरेंच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे –
- शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधीच घेत नाहीत. शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. माझ्या सभांनंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली.
- सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत माझे वडील नास्तिक असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादीचे लोक काय बोलणार?
- राज्यात जातीय विष शरद पवारांमुळे पसरल्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला.
- औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात घेणार
- सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले पाहिजेत, मंदिरांवर असलेले भोंगे देखील उतरले पाहिजेत
- ४ मेपासून आम्ही अजान ऐकणार नाही, दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार
- लाऊडस्पीकर हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. तो विषय धार्मिक करणार असाल तर आम्ही धार्मिक पद्धतीनं उत्तर देऊ
- भोंग्यानंतर राज ठाकरेंचा मोर्चा रस्त्यावरील अजान पठणाकडे, रस्त्यावरील अजान तातडीने बंद करण्याचा इशारा
- गडबड करायला कुणी टाळकी असेल तर तिथल्या तिथे हाणा, ही मनसेची सभा चौरंग करुन घरी पाठवील, सभेत थोडीशी गडबड होताच राज यांचा ठाकरी स्टाईल इशारा