‘भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली’; राहुल गांधींचा हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या १३९ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात दिघोरी नाक्याजवळील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, आपला देश हा कोट्यवधी युवाशक्तीचा देश आहे. मात्र आज युवकांची ही शक्ती पूर्णपणे वाया घालवली जाते आहे. आजचे तरुण हे नोकरी करत नाहीत कारण त्यांच्यासाठी नोकऱ्याच नाहीत. या तरुणांचे दिवसातले सात ते आठ तास हे मोबाइल फोनवर इंस्टाग्राम आणि फेसबुक पाहण्यात जातात. हे भारतातलं वास्तव आहे. तरुणांची शक्ती वाया जाते आहे. भारतातल्या युवकांची युवाशक्ती वाया घालवली जाते आहे. भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली आहे. भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतो.
हेही वाचा – ‘राज ठाकरे हिंदू शेर, त्यांनी आयोध्येत नक्की यावं’; हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज
एकीकडे शेतकऱ्यांवर अन्याय, तरुणांवर अन्याय आणि दुसरीकडे भारतातल्या दोन ते तीन अरबपती व्यापाऱ्यांना देशातली संपत्ती दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे काही तरुण आले मला म्हणाले अग्निवीर योजनेच्या आधी आम्हाला लष्करात घेण्यात आलं होतं. दीड लाख तरुणांना भारताच्या लष्कराने आणि वायुसेनेने घेतलं होतं. या सगळ्यांनी शारिरीक चाचणी पूर्ण केली होती. त्यांच्या नोकरीला मंजुरीही मिळाली होती. मोदी सरकारने अग्निवीर योजना आणली आणि या दीड लाख तरुणांना नोकरीत घेतलंच नाही. देशप्रेमामुळे हे सगळे तरुण लष्करात आणि वायुसेनेत नोकरी करायला गेले होते. हे तरुण सांगत होते सरकारने आमची खिल्ली उडवली. आमच्या गावात आमची चेष्टा केली जाते, असंही राहुल गांधी म्हणाले.