मुंबईसह इतर महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार ?
मुंबई – राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये मुंबईसह अनेक महत्त्वाच्या महापालिका निवडणुका होणार आहे. राजकीय पक्षांनी यासाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका, कोल्हापूर महापालिका आणि वसई-विरार महापालिकेचा कार्यकाळ देखील संपला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यातील सुधारणा व हरकतीत सुधारणा करण्यास विलंब होत आहे.राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा 1965 मध्ये सुधारणा करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.