सूर्य तळपतील चंद्र झळकतील; रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेची प्रतिक्रिया
मुंबई | प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रूपाली पाटील यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की , ‘सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ असे देशपांडे म्हणाले आहेत.रुपाली पाटील यांचे मनसे पक्षांर्गत बऱ्याच दिवसांपासून मतभेद सुरु होते. त्यामुळेच अखेर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता त्या कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या रुपाली पाटील ठोंबरे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असे बोलले जात आहे. याबाबत त्या लवकरच घोषणा करणार आहेत.
‘श्री.राज ठाकरे’ हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल –
रूपाली पाटील यांनी त्यांचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. सोबतच त्यांनी राज ठाकरे यांना पत्रही लिहिले, यात त्यांनी म्हटले की , ‘सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत.यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.’श्री.राज ठाकरे’ हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र,’ असे पाटील यांनी पत्रात नमूद केले.