जेजुरीत देवसंस्थान भूमिपूजनाबाबत ग्रामस्थांचा विरोध
पोलीस ठाण्यात निवेदन : आचारसंहिता काळात धार्मिक कार्यक्रमामुळे सामाजिक तणाव

जेजुरी | कुलदैवत खंडेरायाच्या मंदिर गडकोट अवताराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त समितीने शनिवारी होळकर तलावाजवळील स्वतःच्या मालकीच्या जागेत बहुउद्देशीय इमारत व भक्तनिवास यांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले असताना ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात धार्मिक कार्यक्रम घेऊ नयेत, असा तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थ, मानकरी, खांदेकरी, सेवेकरी, पुजारी आणि माजी विश्वस्तांच्या वतीने पोलीस ठाण्यात निवेदन देत विश्वस्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, बहुतांश विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडित असल्याने आचारसंहिता काळात हा कार्यक्रम घेणे योग्य नाही.
सन २०२२ मध्ये तत्कालीन विश्वस्त मंडळाने होळकर तलावाजवळ अत्याधुनिक रुग्णालयासाठी जागा खरेदी केली होती, जेथे गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा उद्देश होता. मात्र सध्या कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळाने पुणे धर्मादाय आयुक्तांचे आदेश घेऊन उद्देश बदलत भक्तनिवास व बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश’ राजच; सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली, 20 तारखेला शपथविधीची शक्यता?
ग्रामस्थ मंडळाला विश्वासात न घेता आचारसंहिता काळात घाईघाईने भूमिपूजन करण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. याप्रकरणी माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, संदीप जगताप, शिवराज झगडे, नितीन राऊत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणेपाटील, सचिव छबन कुदळे, प्रमुख मानकरी बळवंत पेशवे, रोहन पेशवे इनामदार, रोहिदास जगताप, प्रसाद वासकर, सचिन सोनवणे, हेमंत सोनवणे, अजिंक्य देशमुख, अक्षय दरेकर, शाम दरेकर आदी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आणि विश्वस्तांशी चर्चा केली.
ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले की, ज्या उद्देशासाठी जागा खरेदी केली आहे, त्यासाठी प्राधान्याने रुग्णालय उभारले जावे. निवडणूक झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळासह बैठक घेऊन नंतरच सर्व निर्णय घेतले जावेत, असा आग्रह त्यांनी धरला. या चर्चेनंतर विश्वस्त मंडळाने ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद दिला आणि संभाव्य वाद टळला.
मूळ उद्देश विसरला…?
सन २०२२ मध्ये तत्कालीन विश्वस्त मंडळाने होळकर तलावाजवळ अत्याधुनिक रुग्णालयासाठी जागा खरेदी केली होती, जेथे गरीब आणि सामान्य नागरिकांना अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असा उद्देश होता. सध्याचे विश्वस्त मंडळ या उद्देशाऐवजी भक्तनिवास व बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा निर्णय घेऊन ग्रामस्थांना विश्वासात न घेता आचारसंहिता काळात भूमिपूजन आयोजित केले.




