म्हाडा पुणे लॉटरीचा अखेर मुहूर्त ठरला! १० फेब्रुवारीला सुटणार ४१८६ घरांची सोडत; २ लाख अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

पुणे : तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे मागील कित्येक महिन्यांपासून अडकलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची ४,१८६ घरांची सोडत आता मार्गी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता ९ फेब्रुवारीला संपणार आहे. आचारसंहिता संपताच रखडलेली सोडत काढण्याच्या कामाला पुणे मंडळ लागले आहे. त्यानुसार सोडतीसाठी १० फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. नोव्हेंबपासून सोडतीचा निकाल रखडल्याने दोन लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी असून म्हाडावर टीका होत आहे.
पुणे मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील एकूण ४१८६ घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. या घरांसाठी सप्टेंबरमध्ये नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. मात्र सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये काढली जाणारी सोडत थेट डिसेंबरवर गेली. ४,१८६ घरांसाठी दोन लाख १५ हजार अर्ज दाखल झाले.
या दोन लाखांहून अधिक अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी अंतिम करण्यास तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला. परिणामी, डिसेंबरमधील सोडत रखडली. त्यानंतर पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने मंडळाने छाननीच्या कामाला वेग देऊन १५ डिसेंबरपूर्वी सोडत काढण्याची तयारी सुरू केली. मात्र छाननीचे काम पूर्ण न झाल्याने त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि आचारसंहिता लागू झाली.
सोडत आचारसंहितेत अडकली आणि अर्जदारांची नाराजी वाढली. ऑक्टोबरपासून सोडतीची तारीख पुढे जात असल्याने अर्जदारांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. समाज माध्यमांवरून म्हाडाच्या कारभारावर प्रचंड टीका होऊ लागली. सप्टेंबरपासून अनामत रक्कमेपोटी आमच्याकडून रक्कम घेऊन व्याज कमवणाऱ्या म्हाडाने आम्हाला आमच्या रक्कमवर व्याज द्यावे, अशी मागणीही अर्जदारांकडून होऊ लागली.
सोडत रखडल्याने नाराज असलेल्या अर्जदारांची नाराजी जानेवारीत आणखी वाढली. कारण पालिका आचारसंहिता संपण्याच्या काही दिवस आधीच जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि पुन्हा सोडत अकडली. अर्जदारांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन सोडत काढण्याचा म्हाडाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण आता मात्र जिल्हा परिषदेची आचारसंहिता सोमवारी संपुष्टात येणार आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर एका दिवसाची वाट न पाहता सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितली आहे.
सोडत तातडीने काढणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेळ मिळेल, अशी आशा आहे. १० फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. १० फेब्रुवारीला दोन लाख १५ हजारांहून अधिक अर्जदारांची सोडतीचे, हक्काच्या घर खरेदी करण्याची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारीचा मुहूर्त चुकला तर मात्र अर्जदारांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता असल्याने कोणत्याही परिस्थितीत येत्या आठवड्यात सोडत मार्गी लावणारच, असे म्हाडातील सूत्रांनी स्पष्ट केले.




