Maharashtra Monsoon News : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस , ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली असून अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात हवामान खात्याकडून राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिणेला आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, अशी माहिती ‘आयएमडी’कडून देण्यात आली आहे.
दोन दिवस ‘रेड अलर्ट’
येत्या १३ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ११ जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पावसाचे अपडेट्स…
– मुंबई सकाळपासून पावसाची रिमझिम, काही ठिकाणी पावसाची विश्रांती
– पुण्यात संततधार सुरू. लोणावळा येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी रात्री साडेआठ या वेळेत १६३ मिमी पावसाची नोंद झाली. ‘आयएमडी’च्या लवासा येथील केंद्रावर ३६ तासांमध्ये ३२५.५मिमी पाऊस नोंदला गेला.
– नाशिक शहरात मध्यरात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. रात्री साडेअकरा ते पहाटे साडेपाच पर्यंत ५६.८ मिलीमीटर पावसाची नोंद. हंगामात रात्रभरात पहिल्यांदा सर्वाधिक पावसाची नोंद. आज दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याचा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज.
– दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. ११ हजार क्यूसेकने विसर्ग. गंगापूर धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस. दुपारी दोन वाजता धरणातून विसर्ग सुरू करण्याचा निर्णय.
– पालखेड धरणातून १७ हजार ३३४ क्यूसेकने विसर्ग. कादवा नदीतून १५ हजार क्युसेक पेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे. रौळस पिंपरी (पातळी) पुल लवकरच पाण्याखाली जाण्याची शक्यता. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी करण्याचा निर्णय.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचं थैमान! राष्ट्रीय महामार्ग, नाले, घरं वाहून गेल्याने नागरिक संकटात





