पुणे, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट; कोल्हापूर, सांगलीची काय स्थिती? हवामान विभागाकडून पाच दिवसांचा अंदाज

पुणे : गेल्या 24 तासांपासून मुंबई महानगर परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आज (8 जुलै) पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यामध्ये विविध जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागात दिलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये आज काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी 205 मीमीहून अधिक पावसाची नोंद होईल, असा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील शालेय विद्यार्थ्यांना पीएमआरडीए आणि कॅन्टोन्मेंट हद्दीसाठी पीएमपीएमएलचे मोफत बस पास द्या
दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडासह वाऱ्यांचा वेग 50 ते 60 किमी प्रति तास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान उद्या सुद्धा कोकणामध्ये सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची दैना उडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज (8 जुलै) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. दहा जुलै रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी यलो आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट आणि त्यानंतर उर्वरित तीन दिवसांसाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.





