कधी काळचे सवंगडी, आज पुन्हा ‘जीवलग’ झाले; ३० वर्षांचा वनवास संपला, सुरभी ग्रुपचे स्नेहसंमेलन उत्साहात!
३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र! 'सुरभी ग्रुप'च्या स्नेहसंमेलनाने जुन्या आठवणींना उजाळा; पाचगणीत रंगला मैत्रीचा सोहळा

जावली प्रतिनिधी :
माणूस कामानिमित्त पुणे, ठाणे, नाशिक अशा विविध शहरांमध्ये विखुरला असला, तरी बालपणीच्या मैत्रीची ओढ कधीच कमी होत नाही. याचाच प्रत्यय नुकताच पाचगणी येथे आला. किसनवीर नगर, भुईंज येथील *’सुरभी ग्रुप’*च्या सदस्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र येत आपल्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू केला. पाचगणी टुरिझम फार्म हाऊस येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी हे भव्य स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) अत्यंत उत्साहात पार पडले.
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण मित्र एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ शकत नाही, ही खंत उराशी बाळगून मंडळाच्या वरिष्ठ सदस्यांनी एकत्र येण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला सर्वच मित्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिजीत घोरपडे, राजेश शिंदे, दीपक धनवडे, संतोष राजपुरे, सुनील अमृतसागर, शशांक आव्हाड, विकास कदम आणि संतोष पवार या आयोजकांनी अतिशय सूक्ष्म नियोजन करून या सोहळ्याला मूर्त रूप दिले.
या दोन दिवसांच्या वास्तव्यात मित्रांनी मनसोक्त गप्पा मारल्या, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एकमेकांच्या सुख-दुःखात कायम सोबत राहण्याची ग्वाही दिली. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी मित्र प्रवीण पवार यांचा वाढदिवस असल्याने सर्व मित्रांनी तो मोठ्या उत्साहात साजरा केला. एकमेकांना दिलेल्या प्रेमळ भेटवस्तूंनी अनेकांचे मन भरून आले
हेही वाचा – पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे त्रयस्थांमार्फत लेखापरीक्षण! दर्जेदार घरांसाठी राज्य शासनाचा निर्णय

उपस्थिती आणि नियोजन:
या सोहळ्याला राजू शिंदे, दीपक धनवडे, अभिजीत घोरपडे, संतोष राजपुरे, विकास कदम, सागर माळवडे, संतोष पवार, प्रवीण पवार, शशांक आव्हाड, नितीन अनपट, गोविंद करपे दादा कुंभार, पंकज भोसले, अजित लोखंडे, सचिन ढेंबरे, प्रकाश दुंदळे हे सदस्य उपस्थित होते. मात्र, सुनील गुरव, शफिक फरस आणि संजय माळवडे यांची अनुपस्थिती सर्वांना प्रकर्षाने जाणवली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सागर माळवडे आणि अनिल अमृतसागर यांनी केले, तर समारोप नाशिकचे मित्र शशांक आव्हाड यांनी केला. ३० वर्षांनंतरही टिकून असलेल्या या अनोख्या मैत्रीची चर्चा सध्या संपूर्ण पंचक्रोशीत कौतुकाने होत आहे. आयोजकांनी सर्व सभासदांचे आभार मानून या मैत्रीची शिदोरी आयुष्यभर सोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला.




