एमआयटी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विशेष शिबिर यशस्वी
शिक्षण विश्व : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची जाणीव वाढवणारे उपक्रम

पुणे : एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने फुलगाव येथे ८ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत सात दिवसीय विशेष शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृती उपक्रमांमुळे हे शिबिर विशेष लक्षवेधी ठरले.
शिबिराचे उद्घाटन स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या शुभाशीर्वादाने झाले. यावेळी त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा परस्पर संबंध उलगडून सांगत वेळ, अवकाश आणि सापेक्षतावाद यांसारख्या वैज्ञानिक संकल्पनांचे अध्यात्माशी असलेले नाते स्पष्ट केले. उपसंचालक डॉ. मानसी अतितकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामसेवक श्री. धीरज घोटाळे यांनीही शिबिरातील सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

शिबिरादरम्यान नमामी भीमा अभियान, ग्रंथदिंडी, संविधान गौरव उपक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, सायकल रॅली, सायबर जनजागृती मोहीम तसेच विशेष मुलांच्या शाळेस भेट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत एनएसएस स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना शासकीय मोबाईल ॲप्स डाउनलोड व वापरासाठी मार्गदर्शन केले. डिजिलॉकर, उमंग, आरोग्य सेतू, महाडिबीटी आणि मायगव्ह यांसारख्या ॲप्सची माहिती देत सुरक्षित वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना मिळाली.
हेही वाचा –फुलगाव येथे ग्रंथ दिंडी व संविधान गौरव दिंडी उत्साहात

शिबिरात विविध विचारमंथन व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. स्वामी स्वरूपानंद सरस्वती, श्री. दिनेश शिंदे आणि डॉ. किरण वाणी यांनी अध्यात्म, भावनिक बुद्धिमत्ता व आध्यात्मिक बुद्धिमत्ता या विषयांवर मार्गदर्शन केले. श्री. स्वामीराज भिसे यांनी घेतलेली पथनाट्य कार्यशाळा स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरली. डॉ. अमोल माने आणि डॉ. शरद कदम यांनी स्वयंसेवकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
शिबिरात अध्यात्मापासून सायबर सुरक्षेपर्यंत सुमारे २५ विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. “वारसा शौर्याचा” या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे करण्यात आली. युवादिनानिमित्त जनजागृतीसाठी सायकल रॅलीही आयोजित करण्यात आली.
संपूर्ण शिबिराचे यशस्वी नियोजन व समन्वय एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्री. अरविंद वागासकर यांनी केले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरामुळे स्वयंसेवकांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण अधिक दृढ झाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ समाजसेवेची भावना निर्माण होत नाही, तर जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य घडते. फुलगाव येथील विशेष शिबिरामुळे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांची सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
– डॉ. बी. बी. वाफारे, संचालक.




