महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य होणार; केंद्राकडून 10 लाख घरांना मान्यता मिळणार?

पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशदा, पुणे येथे ‘ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित केले.
हेही वाचा – प्रवेश शुल्कावर नियंत्रणासाठी कठोर नियमावलीची गरज
फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना म्हणाले की, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील. 12,500 कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.