‘डीजीसीए’, ‘एएआयबी’ पथकांकडून तपासणी… ब्लॅक बॉक्स, विमानांचे तुकडे

पुणे : बारामती विमानतळ परिसरात खासगी कंपनीच्या विमानातील भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अपघाताची सखोल चौकशी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. तसेच, दिल्लीवरून विमान अपघात तपासणी विभागाचे (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेटिंग ब्यूरो – एएआयबी) पथक बारामतीतील अपघातस्थळी दाखल झाले आहे. ‘एएआयबी’च्या या पथकाने विमानाचे मुख्य अवशेष आणि ‘ब्लॅक बाॅक्स’चा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ‘व्हीएसआर व्हेंचर प्रा. लि. या खासगी कंपनीच्या संचालकांकडूनही अपघाताच्या चौकशीबाबत संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगितले आहे. या कंपनीचीही चौकशी करण्यात येईल,’ असे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबई येथून व्हीएसआर या खासगी कंपनीच्या विमानाने बारामती येथे निघाले होते.
हेही वाचा – अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून पुण्यातील सर्व दुकाने उद्या बंद
‘डीजीसीआय’ने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) विभागाच्या नोंदीनुसार सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाचे सुरक्षित उड्डाण झाले होते. बारामती येथील विमान मार्गस्थ विदानुसार (फ्लाईट ट्रॅकिंग डेटा) वैमानिकाने सुमारे ८.४० वाजता बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार प्रथमदर्शनी वैमानिकाला कमी दृष्यमानतेमुळे धावपट्टीचा सुरक्षित अंदाज येत नसल्याने (मिस्ट ॲप्रोच) वैमानिकाने बारामती एटीसी विभागाला ‘मे-डे काॅल’ (आपत्कालीन परिस्थितीतील संदेश देण्यासाठीचा संपर्क) केला होता. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत विमान रडारवरून दिसेनासे होऊन ८ वाजून ४५ मिनिटांनी धावपट्टीजवळील १०० मीटर उंचीवरून काही अंतरावर वेगाने कोसळले. अपघातानंतर विमानाला प्रचंड आग लागल्याने स्फोट होऊन ते जळून खाक झाले.’
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
‘डीजीसीए’च्या निर्देशानुसार संबंधित विमानात कुठलाही तांत्रिक बिघाड नसून, सुस्थितीत होते. तसेच, मुख्य वैमानिक सुमित कपूर यांना १६ हजार तासांपेक्षा अधिक आणि सहवैमानिक शांभवी पाठक यांनाही दीड हजार तासांचा अनुभव होता. प्रामुख्याने वैमानिकाला खराब हवामानामुळे धावपट्टीचा अंदाज आला नसावा.
– विजयकुमार सिंह, संचालक, व्हीएसआर एव्हिएशन कंपनी
प्राथमिक माहितीनुसार विमानातील वैमानिकाने ‘एटीसी’बरोबर संपर्क केला. संवादावरून सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी होती. धावपट्टी दिसत नसल्याने विमानाने एक फेरी मारली. त्यानंतर जमिनीवर उतरताना हा अपघात झाला. ‘एएआयबी’चे अधिकारी पोहोचले असून, त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. ‘डीजीसीए’चे अधिकारीदेखील त्यांच्याबरोबर तपास करणार आहेत. या कंपनीच्या विमानाचा २०२३ मध्ये अपघात झाला होता. त्याबाबतदेखील तपास सुरू आहे. त्या वेळी ‘डीजीसीए’कडून लेखापरीक्षण झाल्यानंतर कुठल्याही त्रुटी आढळून आल्या नव्हत्या.
– राममोहन नायडू, केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक मंत्री




