पुण्यात कृषी पणन संचालक मंडळाची बैठक; मंत्री जयकुमार रावलांनी घेतला आढावा

Jayakumar Rawal : महाराष्ट्र राज्य कृषी पणन संचालक मंडळाची मंडळाचे मुख्य कार्यालय गुलटेकडी पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मंडळाच्या विविध विषयांचा आढावा घेतला. या बैठकीत रावल यांनी पणन मंडळातील अधिकाऱ्यांना योजना किंवा सुविधांसाठी नागरिकांना ताटकळत ठेवण्याची मानसिकता बदलून अधिकाऱ्यांनी कामे करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीत ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पणन मंडळ कार्यरत असून त्यांच्या हिताच्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने योजना तयार करा. त्यादृष्टीने व्यवस्था उभी करण्याचे काम पणन मंडळाचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. शेतकरी उपयोगी सुविधा केंद्र असावीत अशा प्रकारे सुविधा केंद्राचे अद्ययावतीकरण करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
हेही वाचा – 400 ड्रोन, 36 ठिकाणी घुसखोरी…; रात्री झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यांची भारतीय लष्कराने दिली अधिकृत माहिती
तसेच शेतकऱ्यांच्या मालाला मूल्य वर्धन करण्याची उपाय योजनाचे नियोजन पणन मंडळाने करावे असे देखील ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा अशी भूमिका शासनाची आहे. त्यांना शासनाच्या योजना किंवा सुविधांसाठी ताटकळत ठेवण्याची मानसिकता बदलून अधिकाऱ्यांनी कामे करावे, अशी सूचना देखील त्यांनी केली.
या बैठकीला कृषी आयुक्त सूरज मांढरे, सहकार आयुक्त दिपक तावरे, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संचालक विकास रसाळ, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, व्यवस्थापक शैलेश जाधव तसेच पणन मंडळाचे सदस्य नारायण पाटील, संचालक संजय पाटील, मंडळातील संचालक व अधिकारी उपस्थित होते.





