सांगोल्यात पाण्यासाठी शेतक-यांचे जनावरांसह तहसिलसमोर ठिय्या आंदोलन [VIDEO]
– 14 गावाचा पाणी संघर्ष कृती समितीने उभारला लढा
विकास शिंदे
पुणे ( महा ई न्यूज ) – सांगोला तालुक्यात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थिती उद्भभवली आहे. शासनाने सांगोल्याचा दुष्काळसदृश स्थितीत समावेश करुनही पिण्याच्या पाण्यासह शेतीचे पाणी आणि जनावरांचा चारा, रोजगाराबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच टेंभू-म्हैसाळ योजनेचे पाणी माणनदीत, पाझर तलावासह फाटा क्रमांक 5 मधून सोडण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी 14 गावच्या पाणी संघर्ष कृती समितीने आज ( शनिवारी) सांगोला तहसिल कार्यालयासमोर शेतक-यांनी जनावरांसह बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनात पाणी आमच्या हक्काचं , नाही कुणाच्या बापाचे… अशा घोषणा दिल्याने विशेषता सत्ताधा-यांसह विरोधी प्रस्थापित नेत्यांच्या भूलथापाना बळी न पडता 14 गावच्या शेतक-यांनी आमच्या मागण्या पुर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा घेत प्रशासन व्यवस्थेला धारेवर धरले आहे.
14 गावच्या पाणी संघर्ष कृती समितीने टेंभूच्या पाण्याने सांगोला तालुक्यातील मेथवडेपर्यंत बंधारे भरुन देण्यात यावेत, टेंभूच्या आठ टीएमसी शिल्लक पाणी वाटपात माणनदी, कोरडा नदी व बुध्देहाळ तलावाचा समावेश करण्यात यावा, आमच्या हक्काच्या 5500 ( एमसीएफटी) मंजूर पाण्यापैकी फक्त 200 (एमसीएफटी) पाणी प्रशासन देत असून उर्वरीत 5300 एमसीएफटी पाणी लवकरात लवकर देण्यात यावे, टंचाईसदृश परिस्थितीमधून टेंभूचे 140 क्युसेक पाणी लोणारवड्यातून कोरडानदीत सोडण्यात यावे, टेंभू कॅनालचे रेल्वे क्राॅसींगचे काम एक महिन्यात पुर्ण करावे, जूलै महिन्यात अतिरिक्त पाणी असताना टेंभूच्या मोटारी चालू करण्यात याव्यात, टेंभूच्या पाणी वितरणावर राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त देण्यात यावा, फाटा क्रमांक 5 वरील कोरडा नाला पर्यंतच्या सर्व सोसायट्यांना मागणीनूसार पाणी द्यावे, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतक-यांना उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधीत्व मिळावे, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी गळवेवाडीतून कोरडानदीत वाढेगाव पर्यंत सोडण्यात यावे, आमच्या हक्काचे 2000 एमसीएफटी पाणी मंजूर असताना उर्वरीत 1500 एमसीएफटी पाणी देण्यात यावे, अशा मागण्या शेतक-यांनी केल्या आहेत.
दरम्यान, सांगोल्यात पिढ्यानं पिढ्याचा दुष्काळ हटविण्यासाठी तालुक्यात शेतक-याची पोरं रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे प्रस्तापित आजी-माजी आमदारांना चांगलीच धडकी भरली आहेत. गेल्या 55 वर्षांत केवळ टेंभू- म्हैसाळ पाण्याचे राजकारण करुन आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील जनतेला झुलवत ठेवले. सांगोल्याचे मंजूर कोट्यातील हक्काचे पाणी प्रस्थापितानी पळविले, त्यामुळे 55 वर्षात सांगोल्याला पाणी मिळालेच नाही, तरीही कागदोपत्री पाणी दिल्याचे तसे रंगविण्यात आले. आता शेतक-याची पोरं हुशार झालीत, त्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनात उतरल्याने प्रस्थापित राजकारणी मंडळीना चांगलाच दणका बसला आहे. या आंदोलनामुळे भविष्यात सांगोल्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळणार आहे.