बोटावरील शाई हेच सन्मानचिन्ह! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय मतदार दिनी तो मोठा संदेश

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सावातील सर्वात मोठा घटक मतदार राजाला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल, X वर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे. त्यात त्यांनी भारतीय लोकशाही, मतदानाचा हक्क, मतदार याविषयी चर्चा करत मोठे भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पत्राची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मतदार हा लोकशाहीचा खरा आत्मा आहे. त्याविषयी त्यांनी भरभरून लिहिलं आहे. काय आहे नरेंद्र मोदी यांचा मतदार राजासाठी महत्त्वाचा संदेश?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदार राजाला खास पत्र लिहिलं आहे. त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भारतीय लोकशाहीबद्दल अभिमान बाळगणारा मी तुमचा सहकारी नागरिक असल्याची प्राजंळ कबुली त्यांनी सार्थ अभिमानाने दिली आहे. त्यांनी यावेळी भारतीय लोकशाहीची उज्ज्वल पंरपरा आणि लोकशाही भारतीय संस्कृतीत किती खोलवर रुजली आहे याचा ऊहापोह केला आहे. शतकानुशतके लोकशाही मूल्यांचा समृद्ध वारसा आपल्या देशाला लाभल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही, चर्चा आणि संवाद ही भारतीय समाजाची त्रिसूत्री होती हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी लोकशाही संस्कार भारतीय संस्कृतीत खोलवर रूजल्याचे सांगितले. 1951 मधील देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा उल्लेख करत आता या वारशाला 75 वर्षे झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या निवडणुका भारतीय जनतेच्या मनात लोकशाही जिवंत असल्याचा आणि लोकशाही त्यांचा आत्मा असल्याचे स्पष्टपणे दाखवून देतो असे पंतप्रधानांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा –हार्बर मार्गावर उद्यापासून धावणार 14 एसी लोकल
यावेळी त्यांनी लोकशाही प्रक्रियेतील निवडणूक, मतदार राजा आणि मतदान प्रक्रिया यावर मोठे भाष्य केले. मतदार असणे हे लोकशाहीतील सर्वात मोठे सौभाग्य असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी ही मोठी जबाबदारी असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर मतदान हा पवित्र घटनात्मक अधिकार असून लोकशाहीतील सहभागाचे ते मोठे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या आणि स्वतःच्या विकासाचा भाग्यविधाता हा मतदारच आहे. बोटावरील ही अमिट शाई हे त्याचेच सन्मानचिन्ह आहे. यामुळे भारतीय लोकशाही ही सशक्त झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
यावेळी जे नव मतदार आहेत. पहिल्यांदा मतदान करणारे आहेत त्यांच्या आयुष्यातील हा मोठा अविस्मरणीय प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीत अशा नव मतदारांचे स्वागत होणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या लोकशाहीच्या उत्सवात त्यांच्याकडे देशाचे भविष्य घडवण्याची ताकद आहे. लोकशाही मूल्यांची पाळंमुळं खोलवर रुजण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणारे कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तर प्रत्येक मतदानासाठी पात्र युवकाची मतदार म्हणून नोंदणी केली जाईल याकडे शाळा आणि महाविद्यालयाने खास कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन ही त्यांनी केले.




